ईसा तडवी, प्रतिनिधी
नांद्रा, 25 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. दरम्यान, किशोर आप्पा यांचा मंत्रीमंडळात समावेश व्हावा, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य पदम पाटील यांच्यासह कुरंगी-बांबरूड गटातील शिवसेना कार्यकर्त्यांनी नांद्रा येथील तुळजाभवानी माता मंदिरात साकडे घातले.
किशोर आप्पांच्या मंत्रीपदासाठी तुळजाभवानी माता मंदिरात महाआरती –
नांद्रा येथील तुळजाभवानी माता मंदिरात कुरंगी-बांबरूड गटातील शिवसेना कार्यकर्त्यांनी आज महाआरती केली. यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांचा राज्य मंत्रीमंडाळात समावेश व्हावा, असे साकडे कार्यकर्त्यांकडून तुळजाभवानी मातेच्या चरणी घालण्यात आले.

यावेळी नांद्रा मा. सरपंच विनोद तावडे, हडसन सरपंच राजेंद्र पाटील, डोकलखेडा सरपंच योगेश पाटील, लासगाव सरपंच समाधान पाटील, कुरंगीचे सुनील पाटील, दिनकर पाटील, गजानन पाटील, उमेश चौधरी, एस.टी.सेनेचे जिल्हा प्रमुख नरेश पाटील, आसनखेडा येथील कैलास पाटील, हडसनचे किरण पाटील, यांच्यासह कुरंगी-बांबरूड गटातील शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील यांची हॅट्रिक –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने सलग तिसऱ्यांदा निवडून येणारे ते पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहिले आमदार ठरले आहेत. दरम्यान, आता त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागावी, अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..