ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 फेब्रुवारी: नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे नुकतेच आयोजन करण्यात आले. दरम्यान, इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या माध्यमातून भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य जागतिक पातळीवर मांडले जात असताना, भारत मंडपम येथे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावरून शिंदेंच्या शिवनेचेचे युवासेना जळगाव जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या माध्यमातून भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य जागतिक पातळीवर मांडले गेले. मात्र, याचवेळी भारत मंडपम येथे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याच्या या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा प्रभावित होऊ शकते, अशी भावना व्यक्त करत युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.
जैन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी अशा स्वरूपाचे आंदोलन होणे उचित नाही. देशाच्या प्रतिमेचा विचार करून राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडावी. भारत-अमेरिका कराराबाबत मतभेद असतील, तर ते लोकशाही पद्धतीने आणि सैद्धांतिक मांडणीद्वारे व्यक्त करणे अपेक्षित आहे. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी केल्याने विदेशी पाहुण्यांसमोर चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या घटनेचा शिवसेना व युवासेना तर्फे निषेध व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेसने प्रकरणाबाबत देशाची माफी मागून जनतेसमोर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे.






