मुंबई : वक्फ दुरुस्ती विधेयक आज 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेत सादर केले जाईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ राखून ठेवला आहे. यानंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर होईल. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या सेनेला यांना आवाहन केले होते. यावर आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं होतं?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?’, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला आवाहन केले होते. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर –
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांनी म्हटले की, ‘देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा, त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला ।’, या शब्दात आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
हेही पाहा – Goshta Shetkaryachi | Ep 1 | एकेकाळी पाण्याची समस्या, आज 11 विहिरी | कसं शक्य झालं| गोष्ट शेतकऱ्याची
दरम्यान, आज लोकसभेत दुपारी 12 वाजता वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यानंतर विधेयकावर लोकसभेत 8 तास चर्चा होईल. या चर्चेदरम्यान लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. तसेच चर्चेनंतर विधेयक मंजूर करण्यासाठी सभागृहात मतविभाजन होण्याची शक्याता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व खासदारांना लोकसभेत हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही आपल्या सर्व खासदारांना व्हिप बजावला असून सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकावर चर्चेसाठी 12 तासांचा अवधी मागितला आहे.
नव्या विधेयकानंतर वक्फ बोर्डात काय बदल होणार?
आधी बोर्डाविरोधात अर्ज वक्फ लवादातच करता यायचा आता रेवेन्यू, सिव्हिल, हायकोर्टातही अर्ज करता येऊ शकतो. आधी दुसऱ्या धर्मातील व्यक्ती वक्फ बोर्डावर नसायचा, आता गैर मुस्लीम देखील आता वक्फ बोर्डावर असेल. तसेच आधी वक्फ लवादाच्या निर्णयाला आव्हान देता येत नव्हतं, आता हायकोर्टात आव्हान देणं शक्य होईल. यासोबतच आधी मशीद असणारी जागा वक्फ बोर्डाची असायची आता दान केलेली असेल तरच जमीन वक्फ बोर्डाची असेल.