मुंबई – ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ काल एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद आहे. पण या दोघांचे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरेंनी स्वत:चा एक पक्ष स्थापन केलेला आहे. त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात. देवेंद्र फडणवी, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचे तसे नाही. आमच्या पक्षाची भूमिका आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही’, असे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेट –
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मुंबईत काल 22 डिसेंबर रोजी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचं लग्न होते. या लग्नाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते.
मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले. लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये काही संवाद देखील झाला. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत –
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी राज ठाकरे यांच्यासोबतही जळवून काम केलेले आहे. त्यांचं आणि माझं, त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या वडिलांशी सर्वांशी नातं राहिलं आहे. उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते, प्रमुख आहेत. तेही माझ्या जवळचे, माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत. काल दोन भाऊ एकत्र आले याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद आहे. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जिवापाड प्रेम आहे. ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे मराठी माणूस त्याच दृष्टीने पाहतो.
दोघांचे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरेंनी स्वत:चा एक पक्ष स्थापन केलेला आहे. त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात. देवेंद्र फडणवी, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचे तसे नाही. आमच्या पक्षाची भूमिका आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही.
महाराष्ट्र लूटण्यात, मुंबई लूटण्यात, मराठी माणसावर अन्याय करण्यात शिवसेनात फोडण्यात या तिघांचा मोठा सहभाग आहे. अशा लोकांसोबत जाणं म्हणजे महाराष्ट्रासोबत बेईमानी ठरेल आणि राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात आणि त्यांच्यासोबत राहतात.
कुटुंब एकच असतं. अजित पवार आणि शरद पवारही भेटतात. रोहित पवारही त्यांच्या काकांना जाऊन भेटतात. पण महाराष्ट्राचे दृष्टीने काही प्रवाह असतात त्या दृष्टीने आम्हाला वाहत जाता येत नाही. हासुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. शेवटी काय निर्णय घ्यायचा हे उद्धव आणि राज हे दोन भाऊ आहेत. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्र मान्य करेल. पण कालचा लग्नसोहळा हा काही राजकीय विषय नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.