मुंबई, 3 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, आता या राजभवनाचे नाव बदलून लोकभवन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्या किस्से राजभवनाचे या मालिकेचे नावही आम्ही किस्से लोकभवनाचे असे करत असून या मालिकेचा हा 18 वा लेख आहे.
दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रशासनाच्या सुरळीत हस्तांतरणासाठी देशातील तीन महत्वाच्या पदावर आसनस्थ असलेल्या ब्रिटिश पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात आले होते. अर्थात केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच ते भारतात थांबले होते.
यातील पहिले होते गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन. दुसरे होते तत्कालीन मुंबई प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर राईट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल आणि तिसरे होते मद्रास प्रांताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर सर आर्चिबाल्ड नाय !
ब्रिटिश संसदेने पारित केलेल्या इंडियन इंडिपेन्डेन्स ऍक्ट १९४७ नुसार भारतातील व्हाइसरॉय पद संपुष्टात आले, परंतु गव्हर्नर जनरल पद कायम ठेवण्यात आले. प्रशासनाच्या सुरळीत हस्तांतरणासाठी माऊंटबॅटन यांना भारताचे ‘गव्हर्नर जनरल’ म्हणून कायम ठेवण्यात आले व ते दिनांक २१ जून १९४८ पर्यंत त्या पदावर कार्यरत होते.
दिनांक २२ जून १९४८ ते २६ जानेवारी १९५० या कालावधीत चक्रवर्ती राजगोपालाचारी हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. देश प्रजासत्ताक होईपर्यंत भारत हे ब्रिटनचे स्वतंत्र अधिराज्य (Independent Dominion) होते.
प्रजासत्ताक झाल्यावर ‘गव्हर्नर जनरल’ हे पद देखील संपुष्टात आले व राष्ट्रपती पद अस्तित्वात आले. दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी डॉ राजेंद्र प्रसाद देशाचे राष्ट्रपती झाले.
मुंबईतील हस्तांतरण –
शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जॉन कॉलव्हिल दिनांक ५ जानेवारी १९४८ पर्यंत – म्हणजे स्वातंत्र्यानंतर साडेचार महिने – मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. मुंबईचे मुख्यमंत्री होते बाळ गंगाधर खेर.
दिनांक ६ जानेवारी १९४८ रोजी कपूरथाळा पंजाब येथील राजघराण्यातील राजा महाराज सिंह मुंबई प्रांताचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
मद्रासमध्ये शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर आर्चिबाल्ड नाय हे दिनांक ७ सप्टेंबर १९४८ पर्यंत मद्रास प्रांताचे गव्हर्नर म्हणून पदावर होते. त्या दिवशी भावनगरचे संस्थानिक असलेले, महाराज कृष्ण कुमारसिंहजी भावसिंहजी हे मद्रासचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
आर्चिबाल्ड नाय त्यानंतर ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त झाले. स्वातंत्र्यानंतर मद्रासचे पहिले मुख्यमंत्री होते ओ पी रामास्वामी रेड्डीयार. भारत प्रजासत्ताक झाल्यावर केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व राज्यपालांनी, मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी व मुख्य न्यायाधीशांनी दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी आपापल्या पदाची संविधानाला स्मरुन नव्याने शपथ घेतली.
माऊंटबॅटन यांची हत्या व भारतात दुखवटा –
दिनांक २७ ऑगस्ट १९७९ रोजी लॉर्ड माऊन्टबॅटन आयर्लंड येथे गेले असताना त्यांच्या लक्झरी बोटीवर आयआरए संघटनेने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात त्यांची हत्या झाली.
एका वृत्तपत्रातील मजकुरानुसार त्यावेळी भारतात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रिन्स चार्ल्स (सध्या राजे चार्ल्स तृतीय) भारत भेटीवर येणार होते व ब्रिटनच्या राजघराण्याशी नात्याने निगडित असल्याने माऊन्टबॅटन हे देखील त्यांच्या सोबत येणार होते. चार्ल्स यांची भारत भेट त्यानंतर एक वर्षानी, म्हणजे नोव्हेंबर १९८० साली झाली.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, लोकभवन, मुंबई)






