चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 9 सप्टेंबर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शहराची वाट धरावी लागू नये, तसेच नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
जळगाव जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासिका’, तर २०० गावांमध्ये नागरिकांसाठी ‘आदर्श सेवा केंद्रे’ सुरू करण्यात येणार आहेत. दोन्ही उपक्रमांसाठी गावांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, सप्टेंबरअखेर अभ्यासिकांच्या निविदा प्रक्रियेला पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात अभ्यासिकेसाठी १०० ग्रामपंचायतींची निवड –
जिल्ह्यातील १,१६० ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात १०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध खोल्या किंवा शाळांमध्ये रिकाम्या खोल्या आहेत, त्या ठिकाणी आवश्यक फर्निचर व मूलभूत सुविधा उपलब्ध करून अभ्यासिका सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था, फर्निचर, पिण्याचे पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच अभ्यास व ऑनलाइन संदर्भासाठी एका संगणकाची सुविधाही देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक अभ्यासिकेसाठी सुमारे चार लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अभ्यासिकांसाठी ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे २५० ते ३०० ग्रामपंचायतींकडून मागणी प्राप्त झाली असून, अनेक ग्रामपंचायती हा उपक्रम सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात मोठ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्यात येणार असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये समप्रमाणात अभ्यासिका उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आणखी गावांमध्ये या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे.
२०० गावांमध्ये नागरिकांसाठी ‘आदर्श सेवा केंद्र’ उभारण्याचा निर्णय –
नागरिकांना विविध शासकीय सेवा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी २०० गावांमध्ये ‘आदर्श सेवा केंद्रे’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ संकल्पनेनुसार ही केंद्रे प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे.
‘आदर्श सेवा केंद्रा’साठी किमान १०० चौरस फुटांची खोली, संगणक, प्रिंटर, बायोमेट्रिक यंत्रणा, वेबकॅमेरा, नागरिकांसाठी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी निकष निश्चित करण्यात आले आहेत. केंद्राच्या दर्शनी भागात उपलब्ध सेवांची यादी असलेला फलक लावणेही बंधनकारक राहणार आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २०० आदर्श सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे नागरिकांना सुमारे ५०० प्रकारचे विविध दाखले व शासकीय सेवा गावातच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, आवश्यक बाबींसाठी जिल्हास्तरावरून सहकार्य करण्यात येणार असल्याचे अकलाडे यांनी सांगितले.
प्रत्येक आदर्श सेवा केंद्रासाठी सुमारे दोन लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यानंतर टप्प्याटप्प्याने या केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोन्ही उपक्रमांसाठी १५वा वित्त आयोग तसेच जिल्हा परिषद सेस फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्थानिक पातळीवर सुविधा मिळण्यासोबतच नागरिकांनाही शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.






