भुसावळ, 27 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका तरुणाने विहिरीत ढकलल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका मातेफिरोने या मुलींना विहिरीत ढकल्याचे माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजता उघडकीस आली.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुली नेहमीप्रमाणे सकाळी शिकवणीसाठी घरातून निघाल्या होत्या. गावालगतच्या शेतरस्त्याने जात असताना दबा धरून बसलेल्या या प्रकरणातील संशयित आरोपी रोहन चौधरी या तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काही कळण्याच्या आतच त्याने दोन्ही मुलींना शेतातील खोल विहिरीत ढकलले आणि तेथून पळ काढला.
मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच काम करणारे शेतकरी आणि रस्त्याने जाणारे ग्रामस्थ विहिरीकडे धावले. ही बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्याने आणि वेळ निघून गेल्यामुळे दोन्ही मुलींचा जीव वाचू शकला नाही. नंतर दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
संशियत आरोपीस अटक –
दरम्यान, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने संशयित आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी माथेफिरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याने असे कृत्य का केले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.






