नवी दिल्ली, 27 मार्च: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन दिले. या संबोधनादरम्यान, त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, ज्याप्रमाणे त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात संयम राखला होता, त्याचप्रमाणे आताही त्यांनी संयम बाळगावा. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते, अशा अफवा पसरू लागल्या. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज – केंद्र सरकाराचा दावा
सध्या जागतिक स्तरावरची परिस्थिती अजूनही अनिश्चित असल्याचे चित्र आहे. ऊर्जा, पुरवठा साखळी (सप्लाय चेन) आणि अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित घडामोडींवर सरकारकडून सातत्याने बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील याची पूर्ण खबरदारी घेत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले. दरम्यान, उद्भवू शकणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या –
यापूर्वीही भारताने जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली मजबुती सिद्ध केली आहे. पुढील काळातही वेळेवर, सक्रिय आणि समन्वयपूर्ण पद्धतीने आवश्यक पावले उचलली जातील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. दरम्यान, लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सध्या तरी अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार सुरू नसल्याचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले.
The global situation remains in flux, and we are closely monitoring developments across energy, supply chains, and essential commodities on a real-time basis.
Under the leadership of Hon’ble PM @narendramodi Ji, all necessary steps are being taken to ensure uninterrupted…
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026
सध्यास्थितीतील परिस्थितीत नागरिकांनी शांतता राखून जबाबदारीने वागणे आणि एकजुटीने परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. अफवा पसरवणे किंवा अनावश्यक भीती निर्माण करणे हे गैरजबाबदार आणि समाजासाठी हानिकारक ठरू शकते, असेही त्यांनी म्हटलंय.






