ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 मे: तालुक्यातील राजुरी येथे आज 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिन उत्साहात संपन्न झाला. कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, नागपूर आणि मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “मधमाशी संवर्धन, परागीभवन आणि शाश्वत शेती” या विषयावर आधारित कार्यक्रमास शेतकरी, विद्यार्थी व ग्रामीण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात मधमाशी पालनाचे महत्त्व, परागीभवनामुळे पीक उत्पादनात होणारी वाढ, जैवविविधतेचे संवर्धन तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध रोजगार व व्यवसाय संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मधमाशी पालनासारखे पूरक व्यवसाय स्वीकारावेत – आमदार किशोर आप्पा पाटील
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मनोगतात मधमाशी संवर्धन हे शेती व पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मधमाशी पालनासारखे पूरक व्यवसाय स्वीकारावेत, असे आवाहन केले. तसेच ग्रामीण भागातील युवक व महिलांसाठी मधमाशी पालन रोजगारनिर्मितीचे प्रभावी साधन ठरू शकते, असे मत व्यक्त केले. त्यांनी आयोजक संस्थांच्या उपक्रमाचे कौतुक करून शेतकरी हितासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची गरज असल्याचे नमूद केले.
मधमाशी पर्यावरण संतुलन आणि अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाची –
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनोजकुमार चोपडा, डॉ. नम्रता महाजन आणि श्री. उमेश पाटील यांनी मधमाशी पालन, आधुनिक तंत्रज्ञान व शेतीमधील परागीभवनाचे महत्त्व यावर सविस्तर माहिती दिली. डॉ. नम्रता महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मधमाशी ही केवळ मध उत्पादनासाठी नसून पर्यावरण संतुलन आणि अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी विविध पिकांमध्ये मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे स्पष्ट केले. विशेषतः फळपिके, भाजीपाला, तेलबिया व कडधान्य पिकांमध्ये मधमाश्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळण्याचे आवाहन केले.
तसेच मधमाशी संवर्धनासाठी शेताच्या बांधावर फुलझाडे व बहुपयोगी वनस्पती लागवड करण्याचा सल्ला दिला.यावेळी त्यांनी आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना सुधारित पेट्या, कृत्रिम राणी निर्मिती, मध संकलन यंत्र, संरक्षणात्मक साधने आणि मध प्रक्रिया पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. मधमाशी पालन हा कमी खर्चात सुरू होणारा आणि शेतीपूरक व्यवसाय असून ग्रामीण युवक व महिलांसाठी उत्पन्नवाढीचे प्रभावी साधन ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
उमेश पाटील यांनी मधमाशी पालनातील प्रत्यक्ष अनुभव सांगताना योग्य व्यवस्थापन, पेट्यांची निगा, रोग व कीड नियंत्रण तसेच ऋतूनुसार मधमाशी वसाहतींचे व्यवस्थापन यावर माहिती दिली. त्यांनी मधमाशी पालनातून मध, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येते, असे सांगितले.तसेच त्यांनी शेतकऱ्यांना परागीभवनासाठी मधमाशी पेट्यांचा नियोजनबद्ध वापर केल्यास पिकांची गुणवत्ता, आकार व उत्पादनात वाढ होत असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट केले. आधुनिक शेतीमध्ये मधमाश्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून “मधमाशी संवर्धन ही काळाची गरज आहे” असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
प्रमुख उपस्थिती म्हणून पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी मधमाशी संवर्धन हे पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असून शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी परागीभवनामुळे पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगून शाश्वत शेतीसाठी मधमाश्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
आत्मा जळगावचे नि. प्रकल्प संचालक अनिल भोकरे यांनी ग्रामीण युवक व महिलांसाठी मधमाशी पालन हा रोजगारनिर्मितीचा प्रभावी व्यवसाय ठरू शकतो असे सांगून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादनवाढ साध्य करावी, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्र, जळगाव येथील विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) किरण जाधव यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वैभव सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून करण्यात आले होते. कार्यक्रमास अनंतराव पाटील, नगराज पाटील, यशवंत पाटील, माधवराव पाटील, घनश्याम पाटील, नितीन पाटील, श्रीकांत पाटील, किशोर उभाळे, ज्ञानेश्वर पाटील, गोरख पाटील, काशिनाथ पाटील, गोपाल पाटील, सौरभ पाटील, रूपेश पाटील व जवळपास 80 शेतकरी, विद्यार्थी, ग्रामीण युवक व महिलांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला, तर अनेक शेतकरी व विद्यार्थ्यांनी Google Meet द्वारे ऑनलाइन सहभाग घेत कार्यक्रमाचा लाभ घेतला. . “मधमाशी वाचवा – जैवविविधता जपा – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा” हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.






