ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 ऑक्टोबर : मराठा समाजाच्या मंगल कार्यालयासाठी पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी 1-1 कोटी रुपयांचा विकासनिधी देऊन येणाऱ्या काळात या समाजाचे भव्य दिव्य असे मंगल कार्यालय उभे करेन अशी मी 100 टक्के ग्वाही देतो, असे आश्वासन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिले. आज पाचोरा येथे मराठा समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी मराठा समाजबांधवांना आश्वासन देत विरोधकांवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले किशोर पाटील –
यावेळी कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, गेल्या 25 वर्षांपासून या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील मराठा बांधवांनी आदरणीय कै. तात्यासाहेबांवर केले. त्यांच्यानंतर या किशोर आप्पावर केलं. आजपर्यंत 70 टक्के बुथवर मराठा समाजाच्या बुथवर या किशोर आप्पाला मत ठेवले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज विरोधक पागल झाले आहेत. मी या सर्वांचे बैठक, मेळावे पाहतोय. यांना आज जातीपातीची आठवण का येत आहे. यांच्या एकाही नेत्याच्या बैठकीत त्यांच्या स्टेजवर बसलेला मराठा समाजाचा नेत्याला 100 तरी लोक मानतात, असे मला कुणी सांगावे. पण इथे एक से एक मराठा समाजाचा नेता आहे. याचे कारण आर. ओ. पाटलांपासून ते किशोर आप्पांपर्यंत काहीतरी केलेले आहे. म्हणून हे इथे बसलेले आहेत. म्हणून याठिकाणी आज सर्वजण आलेले आहेत.
माजी आमदार दिलीप वाघ यांच्यावर टीका –
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी यांच्यासाठी काय केले, हे सांगणार नाही. पण दिलीपभाऊ किशोर आप्पांनी तर तुम्हालाही दिल्याशिवाय सोडले नाही. तुम्हाला मार्केट कमिटीचा मुख्य प्रशासक करुन निदान दोन-चार वर्षांसाठी उदरनिर्वाहाची वेळ तयार करुन दिलीये, या शब्दात त्यांनी माजी आमदार दिलीप वाघ यांच्यावर निशाणा साधला. मार्केट कमिटीमध्ये सत्ता आणून एखाद्या गरीब कार्यकर्त्याला तुम्ही सभापती केले असेल तर सांगावे, असा सवालही त्यांनी दिलीप वाघ यांना केला.
यासोबतच त्यांनी भाजप नेते अमोल शिंदे यांच्यावरही टीका केली. यावेळी ते म्हणाले की, अमोलभाऊ तुम्हाला राजकीय जन्म या किशोर आप्पांनी दिला आहे. आर. ओ. तात्या, के. एम. बापू आणि ओंकार आप्पांनी तुम्हाला कधीच उठू दिलं नाही. पण या किशोर आप्पांनी ती चूक केली आणि तुमच्या वडिलांना नगराध्यक्ष बनवण्याचे काम केले. मराठा समाजाचं माझ्यावर प्रेम असल्याने मी मराठा समाजाला 100 टक्के न्याय देण्याचे काम करू शकलो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. ही विकासाच्या मागे चालणारी जनता आहे. हा मतदारसंघ आणि हा समाज कुठल्याही भूलथापांना बळी पडणारा नाही. त्यामुळे तुम्ही कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर हा समाज तुमच्या पाठीशी कधीही उभा राहणार नाही, हे दाखवून देण्याचे काम आज या माझ्या समाज बांधवांनी केले आहे. मला माहितीये, मराठा समाज कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. पण जे झाड फळ देते त्याच झाडावर दगडं मारण्याचं काम विरोधक करत आहेत. पण यांनी या जनतेसाठी, या समाजासाठी काय केले, हे सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दिलीपभाऊ आणि अमोल शिंदे यांनी खोटं बोलण्याची ट्रेनिंग कुठे घेतली मला एकदा दाखवून द्या या शब्दात त्यांनी टोमणाही मारला. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील असे अनेक कार्यकर्ते आहेत की, त्या कार्यकर्त्यांचे पैसे अमोल शिंदेंकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला.
मराठा समाजाचे मंगल कार्यालय उभे करू –
पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी 1-1 कोटी रुपयांचा विकासनिधी मराठा समाजाच्या मंगल कार्यालयासाठी देऊन येणाऱ्या काळात या समाजाचे भव्य दिव्य असे मंगल कार्यालय उभे करेन, अशी मी याठिकाणी 100 टक्के ग्वाही देतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.
महाराष्ट्रातील कदाचित पहिलाच मतदासंघ –
कदाचित महाराष्ट्रातील हा पहिला मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आमचं सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तयार होत आहे. तुम्हीही आमदार होते, तुमच्याजवळही सत्ता होती, कधी परमेश्वराने डोक्यात तुमच्या टाकले. पण मी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शांताराम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपचे मधुकर काटे, शिवसेनेचे गणेश पाटील, सुनिल पाटील, भूरा आप्पा यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.