जळगाव, 4 ऑक्टोबर : जिल्हा परिषद, जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात “पंचायत राज समृद्ध ग्रामपंचायत अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या आय.एस.ओ. ग्रामपंचायत मोहिमेत जामनेर तालुक्यातील तब्बल 24 ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत आय.एस.ओ. दर्जा प्राप्त केला आहे. यासाठी जामनेर येथील गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
जामनेर तालुक्यातील आय.एस.ओ. दर्जा प्राप्त ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत –
फत्तेपूर, लोंढरी, मेनगाव, टाकळी, गारखेडा, हिवरखेडा, पळसखेडा, निमखेडी पिंप्री, बेटावद, एकुलती, चिंचोली, पळसखेडा प्र.न., लोणी, हिंगणे, पिंपळगाव गोलाईत, मादणी, सवतखेडे, सुनसगाव, कोदोली, ओझरखेड, पहूर पेठ, नेरी, गाडेगाव व वाकी.
या ग्रामपंचायतींनी प्रशासनिक कामकाज, पारदर्शकता, नागरिकाभिमुख सेवा, स्वच्छता, हरित उपक्रम, डिजिटल व्यवहार आणि सामाजिक उपक्रम आदी क्षेत्रांत आदर्शवत कामगिरी करून ग्रामविकासाची नवी दिशा दाखवली आहे.
“समृद्ध आणि आत्मनिर्भर ग्रामपंचायत घडविणे हेच पंचायत राज व्यवस्थेचे खरे बळ आहे. जामनेर तालुक्यातील या 24 ग्रामपंचायतींनी संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला असून, इतर ग्रामपंचायतींनीही त्यांचा आदर्श घेत पुढाकार घ्यावा,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या या अभियानामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजात गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेस नवे परिमाण लाभले असून, ग्रामपंचायत प्रशासनातील जनविश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे.