चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी
जळगाव, 5 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून मतदानाची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. माघारीची मुदत काल संपल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता शिंदेसेना वगळता सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात आता 11 जागांसाठी 139 उमेदवार रिंगणात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पाचोऱ्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील नेमकी कशी लढत होईल, याबाबत ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चा हा स्पेशल रिपोर्ट.
पाचोऱ्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होत आहे. तसेच याठिकाणी भाजपचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याठिकाणी काट्याची टक्कर होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
चाळीसगावातील दोन मित्रच आमनेसामने –
चाळीसगाव मतदारसंघातील परिस्थिती पाहता याठिकाणी एकेकाळी चांगले मित्र असलेले दोन्ही जण एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी भाजपकडून विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून माजी खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप विरुद्ध ठाकरेसेना अशी लढत झाल्याने चाळीसगावची ही लढत जळगाव जिल्ह्यातील हायव्होल्टेज लढत मानली जात आहे.
एरंडोल-पारोळा मतदारसंघात बंडखोर उमेदवारांचे आव्हान –
एरंडोल पारोळा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत व्हायची. यामध्ये राष्ट्रवादीकडून डॉ. सतीश पाटील तर शिवसेनेकडून चिमणराव पाटील यांच्या 5 वेळा ही लढत झाली. दरम्यान, आता चिमणराव पाटील यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. 40 आमदारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने डॉ. सतीश पाटील यांच्या विरोधात चिमणराव पाटील यांचे पूत्र अमोल पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, याठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाली असून माजी खासदार ए. टी. पाटील, ठाकरे गटाचे डॉ. हर्षल माने व भगवान महाजन यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
अमळनेरात मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला –
अमळनेरात कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, यासोबतच याठिकाणी बंडखोरी झाली असून माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने याठिकाणी काट्याची लढत पाहायला मिळणार असून कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये आजी माजी मंत्र्यांमध्ये काट्याची टक्कर –
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विचार केला तर याठिकाणी विद्यमान कॅबिनेट मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या विरोधात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना शरद पवार गटाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. ही लढत दोघांसाठी प्रतिष्ठेची लढत आहे. 2009 मध्ये दोन्ही उमदेवार एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यात गुलाबराव देवकर यांचा विजय झाला होता. तर 2014 मध्ये गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये देवकर यांनी याठिकाणी उमेदवारी केली नव्हती. मात्र, आता पुन्हा 10 वर्षांनी हे दोन्ही आजी माजी मंत्री एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून दोघांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे.
चोपड्यातील परिस्थिती काय?
चोपडा मतदारसंघात भाजपच्या वतीने विद्यमान आमदार लता सोनवणे यांचे पती आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने भाजपचे माजी जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीने चंद्रकांत बारेला आणि आमदार जगदीश वळवी यांची बंडखोरी रोखल्यात यश मिळवले. त्यामुळे याठिकाणी सोनवणे विरुद्ध सोनवणे अशी उद्धव सेना आणि शिंदेसेनेत थेट लढत होत आहे.
जळगाव शहर मतदारसंघात लक्षवेधी लढत –
जळगाव शहर मतदारसंघात भाजपच्या वतीने विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरुद्ध उद्धव सेनेच्या उमेदवार म्हणून माजी महापौर जयश्री महाजन या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, त्यातच भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे व मयुर कापसे यांनी याठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ठाकरे गटाचे माजी महापौर कुलभूषण पाटील यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात लक्षवेधी लढत होणार आहे.
जामनेरात काय होणार –
जामनेरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संकटमोचक म्हणून ओळख असणारे गिरीश महाजन हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात एकेकाळी भाजपचे पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी याठिकाणी आतापर्यंत 6 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदा याठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भुसावळात काट्याची टक्कर –
भुसावळ मतदारसंघ हा जिल्ह्यातील राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी भाजपने सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवार देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचे आव्हान आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार असल्याने ही काट्याची लढत मानली जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे.
मुक्ताईनगरमध्ये आरपारची लढाई –
मुक्ताईनगर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोक विद्यमान शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मोठे आव्हान आहे. 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अवघ्या 1957 मतांनी पराभव केला होता. याठिकाणी मनसेच्या वतीनेही उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणची ही लढाई आरपारची मानली जात आहे.
रावेरमधील चित्र काय?
रावेरमध्ये यावेळी काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार शिरीष चौधरी त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीने दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांचे पूत्र अमोल जावळे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच रावेरचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते दारा मोहम्मद यांनी बंडखोरी केली असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे याठिकाणी पंचरंग लढत होणार आहे. यात कोणी बाजी मारणार, हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल.