मुंबई, 15 जुलै: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीनंतर महायुती सरकारने आज आणखी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या (HP) कृषीपंपांना मोफत वीज दिल्यानंतर, आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला ₹४८,००० कोटींचा जुन्या थकीत वीजबिलाचा बोजा पूर्णपणे माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत आयोजित भाजप किसान मोर्चाच्या ‘शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात’ त्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी आता पूर्णपणे कोरी झाली आहे.
कृषीपंपांचे जुने थकीत वीजबील माफ करण्याची घोषणा –
मुंबईत भाजप किसान मोर्चाच्या वतीने ‘शेतकरी कृतज्ञता सोहळा’ (सत्कार समारंभ) आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताच्या विविध निर्णयां बद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत ७.५ HP पर्यंतच्या कृषीपंपांचे जुने थकीत वीजबिल आता पूर्णपणे माफ केले जाणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ७.५ HP पर्यंतच्या कृषीपंपांचे जुने थकीत वीजबिल आता पूर्णपणे माफ केले जाईल. जुन्या बिलांमुळे महावितरणकडून होणारी वसुली आणि नवीन कनेक्शन मिळण्यातील अडचणी आता कायमच्या मिटणार आहेत. दरम्यान, ही थकबाकी वीज कंपनी सोसणार नसून, राज्य सरकार आपल्या बजेटमधून महावितरणला ही रक्कम देणार आहे. शेतकऱ्यांच्या मोफत विजेसाठी सरकार दरवर्षी सुमारे ₹२५,००० कोटींची वीज सबसिडी देत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पुढे बोलताना सांगितले की, सौर कृषी वाहिनी (सोलर फिडर) योजनेच्या माध्यमातून सध्या ७६% शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील १००% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
केवळ कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, तर शेती शाश्वत करण्यासाठी सरकार नदीजोड प्रकल्प आणि वॉटर ग्रिडवर काम करत आहे. वैनगंगा-नलगंगा यांसारख्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील पाणीटंचाई कायमची दूर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समोर कोणतीही निवडणूक नसताना आम्ही शेतकरी हिताचे हे मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी व्हावा आणि त्यांची पाटी कोरी होऊन त्यांना नवा इतिहास लिहिता यावा, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
हेही वाचा: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी






