चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 15 जुलै : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत पार पडले. या अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न शासनस्तरावर मार्गी लागल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. वीज प्रश्नांच्या संदर्भातील आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, मागील वर्षापासून ते चालू वर्षापर्यंत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उपसमितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदारसंघातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसानभरपाई प्रस्तावांना या उपसमितीने मंजुरी दिली असून, पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल, अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
View this post on Instagram
नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, नुकसानभरपाईची रक्कम लवकरच प्रत्यक्ष खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह शासनाने सकारात्मक भूमिका घेत निधी मंजूर केल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आभार व्यक्त केले. तसेच मंजूर झालेली नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






