नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : नवी दिल्लीत आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सकाळी 11 वाजता सभागृह सुरू होणार आहे. संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने 26 नोव्हेंबरला संसदेत संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून महत्वाची दोन विधेयक मांडली जाणार असताना विविध मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. यासोबतच या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती, वन नेशन-वन इलेक्शन अशी 16 विधेयके आणण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. आजपासून सुरु होणारे हे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
अधिवेशनात महत्वाची दोन विधेयक मांडण्याची शक्यता –
आजपासून सुरू होणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात महत्वाचे 2 विधेयक मांडण्याची शक्यता आहे. संसदेत आज वक्फ विधेयक मांडले जाणार आहे. दरम्यान, सध्या हे विधेयक JPC कडे वर्ग करण्यात आले असून JPC च्या अहवालानंतर हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. असे असताना देशातील वाढती महागाई, अदानी समूहाचे प्रकरण तसेच वेगवेगळ्या मुद्द्यावरून या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
निवडणूक निकालांचा परिणाम अधिवशेनावर होणार? –
देशात हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमधील विधानसभा निवडणुका आणि अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणूक पार पडल्या. असे असताना आज सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, या राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम अधिवेशनावरही दिसून येणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.
विविध मुद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता –
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिका आणि केनियाने नुकतेच लाचखोरीचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस या अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासोबतच मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा तसेच जातनिहाय जणगणेच्या मागणीवर विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील एकतर्फी निकलानंतर ईव्हीएम (EVM) मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..