मुंबई, 26 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच आताचे मंत्रीमंडळ देखील विसर्जित झाले आहे. दरम्यान, आता पुढील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.
आता पुढे काय होणार? –
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. आता राज्यपाल हे विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील. यानंतर मोठा पक्ष हा सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा मिळालेल्या पक्षांचे पत्र हे राज्यपालांना सादर करतील. यानंतर नव्या सरकारमधील मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांचा शपथविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीपदी राहिले –
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेतून बंड करत 40 आमदारांना सोबत घेतले आणि थेट गुवाहटी गाठली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. यानंतर भाजपने शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिला आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले. यावेळी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. यासोबतच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नेतृत्वात काम करत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांना सोबत घेत अजित पवार हे देखील 2023 मध्ये सत्तेत सहभागी झाले होते. दरम्यान, महायुती सरकारचा सध्याचा कार्यकाळ संपुष्ठात आल्याने आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..






