जळगाव, 25 जून: दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, पुढील तीन दिवस जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबई-कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाच्या तीव्र झळा आणि पावसाचा लांबलेला खंड यांमुळे खरिपाच्या पेरण्या संकटात सापडल्या असतानाच, वरुणराजाने राज्यभर जोरदार हजेरी लावल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा सुखावला आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी –
जळगाव जिल्ह्यात तब्बल 20 दिवसांच्या मोठ्या विलंबाने अखेर २४ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला होता आणि चातकासारखी पावसाची वाट पाहत होता. मात्र, 23 आणि २४ जूनच्या दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि जळगाव शहर, पाचोरा, भडगाव, अमळनेर, मुक्ताईनगर तसेच जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्रील विविध भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा व मध्य तसेच उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने दुपारनंतर पावसासाठी वातावरण अधिक अनुकूल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आगामी तीन दिवसांत जिल्ह्याचे कमाल तापमान ३३°C ते ३४°C आणि किमान तापमान २५°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला –
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाने राज्यभरात जोरदार हजेरी लावल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा सुखावला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि पावसाचा लांबलेला खंड यांमुळे खरिपाच्या पेरण्या संकटात सापडल्या होत्या. मात्र, मान्सूनने पुन्हा गती घेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. समाधानकारक पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतीकामांना वेग येणार आहे.






