बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 9 जानेवारीला महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद राहणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेने हा निर्णय घेतला. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक कारवाई करण्यात यावी, तसेच देशमुखांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या अमानुष, अमानवीय पद्धतीने ही हत्या झाली असून यामधील आरोपींवर कारवाई करावी. तसेच राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचे कडक शासन आरोपींना करावे अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.
9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद राहणार –
राज्यभरातील सरपंच मस्साजोगमधील घटनेमुळे हादरले आहेत. समाजसेवा करणे पाप आहे का, असा प्रश्न राज्यातील सरपंचांना पडला आहे. त्यामुळे यामध्ये सरपंच संघटना आक्रमकपणे भूमिका मांडत असून याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. तसेच मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारी या दिवशी बंद राहतील, अशी माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
आर्थिक मदत द्यावी –
शासनाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत शासनाने करावी, अशी मागणीही संरपंच परिषदेने केली आहे. तसेच संतोष देशमुखांच्या कुटुंबातील एक जणांना नोकरी शासकीय द्यावी आणि संतोष देशमुख यांचे गावामध्ये भव्य स्मारक उभे करावे अशी मागणी करण्यात आली आहे.