जळगाव, 1 जानेवारी : जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून वाहनचालकांच्या बेशिस्त वर्तनाबरोबरच प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. अशातच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. आज 1 जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली असून दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना आता हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डींचे आदेश –
जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल दुचाकीवरून प्रवेश करणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. दुचाकी चालक व मागे बसणाऱ्याला हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरून चार वर्षांवरील प्रत्येकाला दुचाकीवरून प्रवास करत असताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव शहरात जरी हेल्मेट सक्ती करण्यात आली नसली तरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तसेच महामार्गावरील चौकांमध्ये हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार आहे.
चार वर्षांवरील व्यक्तींना हेल्मेट बंधनकारक –
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 2024 मध्ये 561 अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये 441 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुचाकीचालक व मागे बसणारा यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गावर मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षांवरील प्रत्येकाला हेल्मेट अनिवार्य केले आहे. दरम्यान, महामार्गावर होणारे दुचाकी अपघात व त्यात होणारे मृत्यू पाहता नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यासाठी महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
…अन्यथा होणार दंडात्मक कारवाई –
मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच हेल्मेट नसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या नमूद करण्यात आले आहे.