नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आदिवासी समाजाचे अतिथी आणि चित्ररथ कलाकार यांच्यासोबत संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता आपल्याबद्दलचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला.
याचवेळी खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एनसीसीची विद्यार्थिनी असलेल्या एका तरुणीने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. राजनंदनी यादव असे या तरुणीचे नाव आहे. ती प्रताप महाविद्यालयातील एफवायबीएस्सीची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील राजेंद्र श्याम यादव (अण्णा मेजर) हे सैन्यदलातील सेवानिवृत्त सैनिक आहेत. तर आई शितल राजेंद्र यादव या माजी नगरसेविका आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधलेल्या या संवादात अमळनेरची राजनंदिनी यादव ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर म्हणाली की, मी एकच गोष्ट सांगेन की, ‘ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली होती, जर त्यानंतर कुणी असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत’. या शब्दात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यानंतर टाळ्यांचा एकच गडगडाट झाला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला सर्वांकडून शिकायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडूनही शिकायचे आहे.
यानंतर तुम्ही याठिकाणी काय शिकलात सांगू शकता?, जसे घरी असाल तेव्हा भाजीपाल्याला कधीच हात लावत नसाल. आईसोबत भांडण करत असाल आणि याठिकाणी ती भाजी खायला शिकला असाल. अशी कोणती नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यात आली, असा प्रश्न पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राजनंदनी यादव हिला विचारला.
यावर राजनंदनी म्हणाली की, सर, याठिकाणी वेगवेगळ्या संचालकांसोबत मैत्री करणे, त्यांच्यासोबत संवाद साधणे, एकमेकांमध्ये मिसळणे. संपूर्ण भारत याठिकाणी आलाय. प्रत्येक प्रकारची अॅडजस्टमेंट करणे याठिकाणी शिकली आहे, असे तिने सांगितले. काल (24 जानेवारी 2025) रोजी झालेल्या या संवाद कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.