• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

काय आहे अहिराणी भाषेचा इतिहास?, खान्देशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. रमेश सुर्यवंशी यांचा विशेष लेख

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 27, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धुळे, नंदुरबार
history of Ahirani language Special article by renowned writer from Khandesh Dr. Ramesh Suryavanshi

काय आहे अहिराणी भाषेचा इतिहास?, खान्देशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. रमेश सुर्यवंशी यांचा विशेष लेख

आज 27 फेब्रुवारी. या निमित्ताने सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने साजरा केला जाते. याच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज खान्देशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. रमेश सुर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले प्रगल्भ संशोधन व अहिराणी बोली, खानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले लिखाणाचा हा विशेष लेख.

खान्देश प्रास्ताविक –

अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगांव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खान्देश म्हणून ओळखतात. पूर्वी खान्देश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खान्देश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिठ्यांचे डोंगर येथ पर्यंत तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्हा पासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिरी पर्यंत इतका होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिकदेश. यादवांच्या काळात हा भूभाग सेउनदेश म्हणून ओळखला जाई. मोगलांच्या कारकीर्दीत हा भाग खान्देश म्हणून ओळखला जाई. व्यवस्थापनाच्या दृष्टिने इ.स. १९०६ मध्ये खान्देश जिल्ह्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश हे दोन भाग पाडण्यात आले. पुढे 1960 पासून पूर्व खान्देशास जळगांव जिल्हा व पश्चिम खान्देशास धुळे जिल्हा अशी नावे देण्यात आलीत.

खान्देश इतिहास :

रामायण-महाभारत यांतील उल्लेखलेल्या ऋषकदेश या भूप्रदेशाच्या वर्णनाशी खान्देशाचा भूभाग जुळतो. खान्देश या शब्दाची उत्पत्ती कान्हदेव, कान्हेरदेव, कान्हाचा देश, कानबाई या शब्दांत शोधण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. मात्र, त्यात तथ्य वाटत नाही. खान्देश या भूप्रदेशाहून इतरत्र कान्हाचा किंवा श्रीकृष्णाचा संबंध अधिकचा आहे. तसेच खान्देशातील अनेक उत्सवांपैकी कानबाई, कानुबाई हा एक उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या भूप्रदेशाला त्या परिसरातील एका उत्सवाच्या नावाने ओळखले जाणे ही शक्यताही कमीच आहे. कान किंवा कानन म्हणजे अरण्य, वन, गवताळ प्रदेश. कान किंवा खान या शब्दाचा अर्थ खाण, खदान, थाळा, मध्ये खोल असणारा भाग, खनि किंवा उत्पत्तीस्थान. सातपुडांच्या रांगा, सह्याद्रीच्या रांगा, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी व परिसरातील डोंगर रांगा यामुळे हा परिसर खोल खदाणी सारखा, खाणीसारखा आहेच. गिरणा, तापी, नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा हा भाग दाट अरण्याचा, गुरांसाठी विपूल गवत असणारा प्रदेश. येथे विपुलता (खाण) होती, चौफेरुन नैसर्गिक तटबंदीमूळे (भेसळ मुक्त अशी) शुद्धता, व शुद्ध वंश (खान, खानदानी) होती. म्हणून खदाणीचा खाणीचा देश, चांगल्या वंशाचा-खानदानीचा देश, गवताचा-कानन देश या वरुन खानदेश हे नामाभिदान झाले असावे, असल्या व्युत्पत्तीचांही विचार करण्याजोगा आहे.

अशिरगड हे अश्वस्थाम्याचे स्थान होते. तर पांडवाविरुद्ध तोरणमाळचा राजा लढला होता ते तोरणमाळ धुळे जिल्ह्यात आहे असे महाभारतकालीन उल्लेख आढळतात. चाळीसगांव जवळील पाटणे परिसरात आद्य पराष्मयुग व तदनंतर अप्पर पराश्म युगात मानवी वस्ती होती हे उत्खननात सापडलेल्या पाच स्थरांवरुन सिद्ध होते. बहाळ येथे सापडलेली नाणी, घटोत्कच्छ लेण्या, नागद, मूंदखेडे, मेहुनबारे, बहुलवाड येथे सापडलेले ताम्रपट, सारजादेवी मंदिरावरील शिलालेख, अंजिठा लेण्या, इ. पुराव्या आधारे खान्देशच्या इतिहासावर प्रकाश पडतो. खान्देशात इ.स.पूर्व चौथे ते इ.स. दुसरे शतकात मौर्याचे राज्य होते. पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती.

तिसऱ्या त्या पाचव्या शतकांत वाकाटकांची सत्ता होती (वर्षदेव, स्वामीदास, मुलंदा) चौथ्या शतकांत वाकाटकांसोबतच अभीरांचीही सत्ता होती. इ.स. 655 ते 702 या काळात सेद्रकांचे (निकुम्माल्लशक्ती, नृपती जयशक्ती, नृपती वैरसेन) राज्य होते. या सोबतच सहाव्या शतकांत कलचुरी तर सातव्या शतकांत पुलकेशीचे तर आठव्या शतकात त्रैकूटकांचे राज्य होते. त्या नंतर नवव्या ते बाराव्या शतका पर्यंत राष्ट्रकूट, सोमवंशी, आणि यादव यांचे राज्य होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजी, अकबर, यांच्या सत्ते नंतर 18 व्या शतकांत (इ.स-1720) निझामांचे राज्य होते. 1760 ते 1818 हा मराठ्यांचा काळ तर 1818 ते 1974 हा ब्रिटिशांचा काळ गणला जातो.

अहिर – अहिराणी :

रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, ब्रहतसांहिता, नासिक लेणे, महाराष्ट्र ज्ञानकोश, डब्ल्यू क्रूक यांचा कास्ट अॅण्ड ट्राइब्ज इन नॉर्थ वेस्टर्न इंडिया, आ. इ. इन्थोव्हेन यांचे ट्राईब्ज अॅण्ड कास्ट ऑफ बॉम्बे इ. ग्रंथावरुन अहिरांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्यानुसार खान्देश हा मूळचा अहिरांचा देश. अहिर ही शेतकऱ्यांची, गवळ्यांची एक जात. प्रमुख उद्योग गुरे राखणे. मत्स्यपुराणात सात तर वायू पुराणात दहा अशी अहिर राज्यांची संख्या दिसते. इ.स. 150 मध्ये आध्रांचा ऱ्हास होऊन अभीरांचे राज्य आले. वायव्येकडून ते दक्षिणेकडे सरकत आले. चौथ्या शतकात खान्देशावर अहिरांचे राज्य होते. आठव्या शतकात काठी लोक जेव्हा गुजराथेत आले तेव्हा बराच मुलुख हा अहिरांच्या ताब्यात होता.

या अहिरांची वाणी-बोली ती अहिरवाणी किंवा अहिराणी. खान्देशात अहिराणी ही कृषी जीवन जगणाऱ्याची बोली आहे. खान्देश या जिल्ह्याच्या भूप्रदेशात ती बोलली जाते. म्हणून ती खान्देशी. आता खान्देश जिल्हा हा जळगांव व धुळे या दोन जिल्ह्यात विभागला आहे. मात्र, या बोलीचे क्षेत्र या जिल्ह्याच्या क्षेत्राहून हे मोठे आहे. चांदवडचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, वाघुर नदी आणि संह्यपर्वत, अजिंठ्यांचे डोंगर या निसर्गाने तोडून वेगळ्या ठेवलेल्या खोलगट भूभागात, खदाणीत, खाणीत ही खान्देशी, अहिराणी बोलली जाते. या भूभागात मग नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, जळगांव, धुळे या जिल्ह्याच्या गावांचाही समावेश होतो.

खान्देशात अहिर होते. कालानुरुप त्यांच्या नावांत बदल झाला. मात्र, त्यांची अहिराणी, अभिरोक्ती किंवा अभिरी आजही टिकून आहे. अभीर म्हणजे यदुवंशीय; अभीर किंवा अहिर ही गवळ्यांची, गुरे चारणाऱ्यांची, कृषि-उद्योग करणाऱ्यांची एक जात. इत्यादी
इतर भाषिकांनी अहिरांच्या बोलीला अहिरवाणी किंवा अहिराणी म्हणून ओळखले किंवा संबोधले. अहिर हे खान्देशात सर्वत्र पसरलेले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या बोलीवर सुद्धा अहिराणीची छाप पडणे साहजिकच होते. या खान्देशातील अहिराणीला खान्देशी या प्रादेशिक नावाने देखील ओळखले जाऊ लागले.

अहिराणी आणि खान्देशी :

खान्देशात अहिरांचे वास्तव्य होते. अहिरांनी सुपीक जमिनीवर गुरे चारण्यासोबतच शेती व्यवसाय सुरू केला. शेती व्यवसायाला पुरक असे विविध व्यवसाय करणारे इतर लोक अहिरांशी सततच्या संपर्कात येवू लागले. सत्ता, व्यापार, व्यवसाय यातील अहिरांच्या भाषेचे वर्चस्व हे खानदेशभर वाढल्याने अहिराणी ही प्रदेशाच्या नावाने म्हणजे खानदेशी बोली या नावाने ओळखली जाऊ लागली. ती एका जातीची भाषा न राहता ती त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची, प्रदेशाची भाषा झाली. अहिरांशी सततचा इतर भाषिकांचा संपर्क आला. तो इतर भाषिक समाजही त्यांच्या स्वतःच्या बोलींची छाप असणारी अहिराणी, मिश्र अहिराणी बोलू लागला. बोलीचा उल्लेख करतांना ती त्या प्रदेशाची बोली, खान्देशाची बोली म्हणून खान्देशी या नावाने गणली गेली. खान्देशी बोली ही संकल्पना अहिराणी बोली ह्या संकल्पनेपेक्षा विशाल आहे. त्या त्या परिसरातील खानदेशी ही त्या त्या परिसराच्या नावाने संबोधली जाऊ लागली.

ज्या ज्या जमातींनी ती भाषा स्विकारली त्या त्या जमातींच्या नावाने ती बोली ओळखली जाऊ लागली. या नुसार खान्देशी बोलीचे सामाजिक आणि प्रादेशिक असे प्रभेद निर्माण झालेत. खान्देशीच्या प्रादेशिक प्रभेदांचा विचार करता, खान्देशाच्या नैऋत्ये कडील बागलाण भागातील ती बागलाणी, उत्तरे कडील तापीच्या परिसरातील ती तप्तांगी, दक्षिणेकडील ती दखनी किंवा डोंगरांगी, पश्चिमेकडील ती वरल्ह्यांगी, पूर्वेकडील ती खाल्ल्यांगी, नेमाड कडील ती नेमाडी, डांगान परिसरातील ती डांगी, तसेच तावडी असे प्रादेशिक प्रभेद आढळतात. तर सामाजिक प्रभेदात, खानदेशात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक जातीच्या स्वतःच्या बोलीची छाप असलेली अहिराणी बोली ही त्या जातीची स्वतंत्र नामधारण करुन सामाजिक प्रभेदाचे रुप बनली. त्यात महारांची ती महाराऊ, लाडशाखीय वाण्यांची ती लाडसिक्की, भिल्लांची ती भिलाऊ, अहिरांची ती अहिराणी, लेवा पाटीदारांची ती लेवा पाटीदार बोली, पावरांची ती पावरी, काटोनी भिल्लांची ती काटोनी, घाटावरुन आलेल्यांची स्वतःच्या बोलींची छाप असलेली ती घाटोयी, गुजरांची ती गुजरी, भावसारांची ती भावसारी, परदेशांची ती परदेशी अशा जाती निहाय अहिराणीच्या सामाजिक प्रभेदांची यादी वाढतच गेली. या सर्व सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदांना एकाच नावाने सामावून घेणारी विशाल संकल्पना ही “खान्देशी बोली” जी संपूर्ण खानदेशात बोलली जाते.

लेखन – डॉ. रमेश सुर्यवंशी (खान्देशातील नावाजलेले साहित्यिक)

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahiraniahirani bhashakhandeshmarathi bhasha dinmarathi bhasha gaurav din

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page