जालना, 30 मे: मराठा आरक्षणासंदर्भातील प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (30 मे) सकाळी 10 वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या तीव्र उष्णतेत गावातील मोकळ्या मैदानावर बसून त्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला.
आंदोलनस्थळी शिस्त कायम राहावी आणि कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना विशेष सूचना दिल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी हातात काठी घेऊन ठरावीक अंतरावर शांततेत बसावे, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी त्यांनी स्वतः जमिनीवर एक रेषा आखून त्या मर्यादेच्या पलीकडेच आंदोलकांनी बसावे, असे सांगितले.
रखरखत्या उन्हात जरांगेंचं उपोषण सुरू –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आपले आमरण उपोषण सुरू केले आहे. रखरखत्या उन्हाची आणि वाढत्या तापमानाची तमा न बाळगता त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. कडक ऊन आणि उष्णतेची लाट असतानाही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर हे पाऊल उचलले आहे.
वैद्यकीय पथक तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त –
उन्हाचा पारा कमालीचा वाढलेला असताना जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू केल्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अंतरवाली सराटीमध्ये वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून, पोलीस प्रशासनानेही या भागात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मराठा समाजातील आंदोलक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी दाखल होत आहेत.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला अपयश –
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. या शिष्टमंडळात राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता. दोघांनीही जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. सुमारे दीड तास चाललेल्या चर्चेदरम्यान हैदराबाद गॅझेट तसेच सगेसोयऱ्यांच्या कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
मनोज जरांगे उपोषणावर ठाम –
सरकार सकारात्मक असल्याचे सांगत विखे पाटील यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. दोन्ही बाजूंमध्ये प्रदीर्घ चर्चा होऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आजपासून जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा आंतरवाली सराटीत दाखल होणार असून पुढील चर्चेत काही मार्ग निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






