जळगाव, 30 मे: राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली, तरी जळगावच्या जागेवरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ही जागा परंपरागत रित्या भाजपकडे असल्याने ती पुन्हा भाजपलाच सुटणार असल्याचे संकेत मिळताच, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आज 30 मे रोजी जळगावहून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्री गुलाबराव पाटील मुंबईकडे रवाना –
जळगावच्या जागेबाबत अजूनही काहीच निर्णय झालेला नाहीये. जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय होईल, असे अपेक्षित आहे. आता मी मुंबईला जायला निघालो असून निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावहून मुंबईला रवाना होण्यापुर्वी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
मुलाच्या उमेदवारीसाठी मंत्री गुलाबराव पाटील आग्रही –
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. प्रतापराव पाटील यांनी याठिकाणी उमेदवारी मिळावी, यासाठी मंत्री गुलाबराव पाटील सुरूवातीपासूनच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महायुतीच्या प्राथमिक जागावाटप सूत्रात जळगावची जागा भाजपने स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना गोटात अस्वस्थता पसरल्याचे समजते.
भाजप प्रवेशाच्या अफवांचे गुलाबराव पाटलांकडून खंडन –
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा कायम असतानाच्या राजकीय घडामोडींदरम्यान, जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि त्यांचे सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी या चर्चा धुडकावून लावल्या. “मी गेली ४५ वर्षे कट्टर शिवसैनिक आहे. माझ्या निष्ठेवर कोणीही शंका घेऊ नये,” अशा शब्दांत त्यांनी या अफवांचे खंडन केले.






