जळगाव : आज 8 मार्च रोजी सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे. मात्र, याच महिला दिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. तसेच त्यांनी आपल्या या पत्रात आपल्याला एक खून माफ करण्यात यावा, अशी अनोखी मागणी केली आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या पत्रात काय म्हटले?
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपल्या पत्रात लिहिले की,
मा. द्रौपदी मूर्मू राष्ट्रपती, भारत
विषय :- एक खुन माफ करणेबाबत
‘महोदया, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे.
दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, 12 वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल? नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे, अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे.
या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो. आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा.
महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू.
धन्यवाद! सौ रोहिणी खड़से खेवलकर प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
हेही वाचा – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्त्वाची माहिती