अमळनेर : अहिराणी साहित्य परिषद, धुळे आणि धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी अमळनेर यांच्या वतीने पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे येत्या 30 व 31 मार्च रोजी या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात हे संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खान्देशची बोलीभाषा असलेल्या अहिराणीचा जागर यानिमित्ताने होणार आहे. तसेच अमळनेरकर रसिकांना खान्देशचा गोडवा असलेल्या अहिराणी भाषेतून कथा, कविता, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी मिळणार आहे. या साहित्य संमलेनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य लीलाधर पाटील यांनी माहिती दिली.
या साहित्य संमेलनात खान्देशी संस्कृतीची झलक दाखविणारी ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा, अहिराणी भाषेतून आपल्या खास शैलीतून व्यक्त होणाऱ्या वैविध्यपूर्ण कविता तसेच खान्देशचे वैशिष्ट्य असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी याचबरोबर अहिराणी बोली भाषेचे महत्त्व स्पष्ट करणारा परिसंवाद, खान्देशी लोक परंपरा व खान्देशी माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य टिपणाऱ्या दर्जेदार कथा त्याचप्रमाणे डंका वाजविणारे अहिराणी गाणी नृत्य आर्दीचा समावेश या अहिराणी साहित्य संमेलनात केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या साहित्य संमेलनात अहिराणी साहित्यिकांना ‘अहिराणी भूषण पुरस्कार’ तर आहे अहिराणी प्रसार करणाऱ्या कलाकारांना ‘अहिराणी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या दिवशी, 30 मार्च रोजी संमेलनाचा प्रारंभ सायंकाळी 4 वाजता होईल आणि 31 मार्च रोजी ईद निमित्त सुट्टी असल्याने दोन्ही दिवशी सहपरिवार जास्तीत जास्त रसिकांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन रणजित शिंदे, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा. डी. डी. पाटील, अहिराणी साहित्य परिषद धुळेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, के. डी. पाटील, वसुंधरा लांडगे, गोकुळ बागुल, डॉ. कुणाल पवार, डॉ. दत्ता ठाकरे, अजिंक्य चिखलोदकर आदी मान्यवर उपस्थित होते.