नागपूर, 16 मार्च : कोणताही व्यक्ती हा त्याची जात, पंथ, भाषा, लिंग तसेच धर्म यावरून मोठा होत नसतो तर त्याच्या गुणांमुळे तो मोठा होतो. म्हणून जात, पंथ, धर्म आणि लिंग या आधारावर मी कोणामध्ये भेद करत नाहीये. मात्र, आयुष्यात शिक्षण हे महत्वपुर्ण असून शिक्षणामुळे केवळ तुमची अथवा तुमच्या परिवाराचीच प्रगती होणार नाही तर समाजाचा तसेच देशाचा विकास होतो.
दरम्यान, इतर कुठल्याही समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे. यामुळे दिवसातून अनेक वेळा नमाज पठण करा. पण, नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात आयोजित सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. इंजिनीयर, डॉक्टर, आयएएस तयार झाले तरच समाजाचा विकास होईल, असेही मंत्री गडकरी यावेळी म्हणाले.
नितीन गडकरी काय म्हणाले? –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मी आमदार असताना अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूट (नागपूर) इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी दिली होती आणि मुस्लीम समाजाला याची गरज आहे. मुस्लीम समाजातून अधिकाधिक अभियंते, आयपीएस, आयएएस अधिकारी निर्माण झाले तर सर्वांचा विकास होईल. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. दरम्यान, अंजुमन-ए-इस्लामच्या बॅनरखाली आज हजारो विद्यार्थी इंजिनिअर झाले आहेत. याचा मला आनंद असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.
View this post on Instagram
…अन् मंत्री गडकरींनी सांगितला तो किस्सा –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, अनेकांना वाटतं की, मी इंजिनिअर आहे. कारण माझ्या नावावर 7 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. आतापर्यंत मला 12 वी डिलीट पदवी मिळाली आहे. तरी देखील मी माझ्या नावासमोर डॉक्टर पदवी लावत नाही. कारण, व्यावसायिक शिक्षणक्रमात 50 टक्क्याहून अधिक गुणांची गरज असते.
मात्र, भारतात 1975 साली आणीबाणी घोषित झाल्यानंतर, मी 11 वीत असताना आणीबाणीविरोधात काम केले. यामुळे माझे करिअर खराब झाले. इंजिनिअरिंगच्या प्रवेश परिक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीच अपात्र ठरलो. म्हणून मी म्हणतो की, जर जो व्यक्ती प्रवेश परीक्षेसाठीच अपात्र ठरत असेल तर तो डॉक्टर कसा बनू शकतो, यामुळे मी माझ्या नावाला डॉक्टर पदवी लावत नसल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.
‘जो करेगा जाति की बात, उसको मारूंगा लात’ – नितीन गडकरी
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मी राजकारणात आहे आणि इथे खूप काही बोलले जाते, पण मी ठरवले की मी माझ्या पद्धतीने काम करेल. शिवाय मला कोणी मते देईल की नाही याचा देखील मी विचार करत नाही. अनेक जातीवाले लोक मला भेटायला येतात. मात्र, मी 50 हजार लोकांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाते सांगितले होते की, ‘जो करेगा जाति की बात, उसको मारूंगा लात’. यानंतर माझ्या मित्राने मला सांगितले की, ‘तु स्वतः तुझ्या हाताने तुझं नुकसान केलंय असे’ मात्र, मी म्हटलं नाही, जे होऊल ते होईल. पण मी माझ्या भूमिकेवर कायम राहील आणि व्यक्तिगत जीवनात त्याचे आचरण करेल.
दरम्यान, सार्वजनिक चर्चेत आपण कधी जात आणि धर्म आणत नाही, कारण माझा विश्वास आहे की लोक समाजसेवा सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानतात, असेही मंत्री गडकरी म्हणाले.
हेही वाचा : “मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊतांची स्वतःच होती इच्छा!” मंत्री संजय शिरसाटांचा दावा नेमका काय?