मुंबई : जळगाव शहराच्या युवकांना पुणे मुंबईला जावे लागते. त्यामुळे नवीन उद्योग येणे फार गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणेही फार गरजेचे आहे. नवीन उद्योग येण्यासाठी नवीन एमआयडीसीची आम्ही मागणी केलेली आहे. त्याची घोषणाही झालेली आहे. पण आता त्याला चालना मिळावी, अशी मागणी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी राज्य सरकारकडे केली.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी अर्थसंकल्प 2025-26 बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच जळगाव जिल्ह्यातील पोलीस, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रश्न मांडत राज्य सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या.
काय म्हणाले आमदार राजूमामा भोळे –
यावेळी आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, अर्थसंकल्पाच्या चर्चेत कोकणाची चर्चा होते, विदर्भाची चर्चा होते, मराठवाड्याची चर्चा होते, पण फक्त उत्तर महाराष्ट्राची चर्चा होत नाही. उत्तर महाराष्ट्राच्या माध्यमातून विशेष चर्चा लावून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागाला नक्कीच मदत होऊ शकते. जळगाव शहराच्या विकासासाठी जळगाव महानगरपालिकेला भरीव निधी देण्याची मागणीही आमदार राजूमामा भोळे यांनी यावेळी सरकारला केली.
तसेच जळगाव शहर आणि ग्रामीण या दोन मतदारसंघांमध्ये जळगाव शहराची लोकसंख्या 7 लाखांच्या आसपास तर जळगाव ग्रामीणची लोकसंख्या 4 लाख आहे. या 10 लाख लोकांच्या संख्येत 1 तहसीलदार आणि 1 तहसिल ऑफिस असल्याने जळगाव शहर तहसिल ऑफिस वेगळे करावे. जळगाव तहसिलदार वेगळा व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
जळगाव महानगरपालिकेसंदर्भात निधी देत असताना आपल्या महापालिकेत खुले भूखंड खूप आहेत. त्याचीही आम्ही मागणी केली आहे. त्या माध्यमातून शासनाने मंजुरी दिली तर नक्कीच मदत होऊ शकत असल्याचे ते म्हणाले.
नवीन एमआयडीसीला चालना मिळावी –
जळगाव जिल्ह्याच्या आजूबाजूला 400 किलोमीटरच्या आत नागपूर, पुणे, इंदौर, सुरत, मुंबई हे सर्व मेट्रो सिटी आहेत. त्यामुळे जळगावचे बिझनेस कोटेशन खूप चांगले आहे. मात्र, तरीही नवीन व्यवसाय येणे खूप गरजेचे आहे. जळगाव शहराच्या युवकांना पुणे मुंबईला जावे लागते. त्यामुळे नवीन उद्योग येणे फार गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणेही फार गरजेचे आहे. नवीन उद्योग येण्यासाठी नवीन एमआयडीसीची आम्ही मागणी केलेली आहे. त्याची घोषणाही झालेली आहे. त्याला चालना मिळावी, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी राज्य सरकारकडे केली.
जळगाव जिल्हा समृद्धीला महामार्गाला जोडावा –
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग याबाबत बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातून आमचे जळगाव बाजूला गेलेले आहे. मुख्यमंत्री महोदय जळगावला आले असताना त्यांनाही आम्ही मागणी केली. या समृद्धी महामार्गाला खुलताबाद आणि फुलंब्रीच्या मध्ये जळगाव जिल्ह्याला जर जोडता आले, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी केली.
पोलिसांना घर मिळणे गरजेचे –
पोलिसांनी चांगली सेवा बजावली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. मात्र, यासोबतच पोलिसांना सुविधा देणेही गरजेचे आहे. मागच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पोलिसांना 2 बीएचके घरे मंजूर झाली. भविष्यातही 2 बीएचके घरे जिल्ह्यातील राहिलेले जितके पोलीस असतील, त्या प्रत्येकाला राहण्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे. या माध्यमातून सरकारने याबाबतची तरतूद करावी, जळगाव शहरात 3 नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करावी, पोलीस संख्या कमी असल्याने पोलीस भरती करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी सरकारला केली.
ज्येष्ठ नागरिकांना पॅकेज द्यावे –
जळगाव हे जिल्ह्याचे शहर असल्याने शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आज प्रत्येक नागरिकाने पतपेढीमध्ये पैसे ठेवले आहेत. त्या पतपेढीतील पैसे लागल्याने आज जर त्यांच्या मुलींचे लग्न करायचे असेल, त्यांना हॉस्पिटलसाठी पैसे लागत असतील तर पैसे अटकल्याने त्यांना शासनाने लक्ष घालून त्यांना काहीतरी पॅकेज देऊन ज्येष्ठ नागरिकांचे पैसे देणे गरजेचे आहे. मागच्या वेळी 100 कोटी रुपयांचे पॅकेज दिले गेले पण ते काही पुरेसे झाले नाही. बऱ्याच नागरिकांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक ठेवीदार आहेत त्यांना विनंती आहे की, ज्यांनी लोन घेतले असेल त्यांच्या संपत्ती जप्त करुन शासनाने लिलाव करावा आणि एक पॅकेज देऊन सरकारने लक्ष घालून त्या ज्येष्ठ नागरिकांचे पैसे देणे गरजेचे आहे, असे आमदार राजूमामा भोळे म्हणाले.