अमरावती, 16 एप्रिल : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राती अनेक प्रकल्प बंद पडले होते. अनेक योजना बंद पडल्या होत्या. महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता. मात्र, महायुतीचे 2022 पासून सरकार आले आणि खऱ्या अर्थाने विकास योजनांचे टेक ऑफ झाले. त्यावेळी विमानाचा मी पायलट होतो आणि देवेंद्रजी तसेच अजितदादा कॉ-पायलट होतो. आता देवेंद्रजी पायलट आहेत आणि मी तसेच अजितदादा कॉ-पायलट आहेत. पायलटची शीट बदलली मात्र विकासाच्या विमानाची गती तीच आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अमरावती विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते आज दुपारी बोलत होते. दरम्यान, इंजिन तेच आहे मात्र जास्त वेगाने विकासाचे ते इंजिन धावत आहे आणि त्या विकासाची भरारी पुढील काळात निश्चित दिसेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विमानासोबतच अमरावतीचा विकास झेप घेणार –
महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सात ते आठ तासांहून अधिक काळ लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. म्हणून नागपूर ते मुंबई प्रवासासाठी 15 ते 20 तास लागायचे. मात्र, आज समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून सहा ते आठ तासात नागपुरहून मुंबईत पोहचता येते.
View this post on Instagram
दरम्यान, आता अमरावतीत विमानतळ झालंय. फ्लाईंग क्लबचा देखील शुभारंभ झालाय. मोठ्या प्रमाणात याठिकाणी ट्रेनर तसेच पायलट याठिकाणाहून मिळतील. खरंतर, अमरावतीतून विमान जेव्हा आकाशात झेपावतील, त्यासोबतच अमरावतीचा विकास तसेच प्रगती झेप घेणार असल्याचे उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अशाप्रकारचे पायाभूत सुविधा देणारे महाराष्ट्र नंबर वनचे राज्य असल्याचे उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्या कामाचा महाराष्ट्र साक्षीदार –
समृद्धी महामार्गाची आखणी जेव्हा केली तेव्हा अनेक लोकांनी त्याला विरोध केला. काही लोकांनी आडमूठी अर्थात विकासाविरोधात भूमिका घेतली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग अमरावती जिल्ह्यातूनही जातो. हा विकासाचा महामार्ग ठरणारा आहे, असा आम्ही निश्चय केला आणि देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरून त्याचे काम पुढे घेऊन गेलो. खरंतर, “मुश्किल की नही जीत की राह, ठान ले जो तु अगर…ओ मंजिल खुद चलकर के आएगी, नाप दे जो तू डगर” असे शेअर म्हणत अडीच वर्षात आम्ही जे काम केलं त्याचा महाराष्ट्र साक्षीदार असल्याचे शिंदे म्हणाले.
अमरावती विमानतळाचे उद्घाटन –
अमरावती विमानतळाचे आज उद्घाटन करण्यात आले असून नागरी हवाई सेवेचा आज शुभारंभ झाला. अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई-अमरावती-मुंबई या नागरी विमानसेवेच्या पहिल्या प्रवासी विमानाने आज मुंबईहून उड्डाण करून अमरावती विमानतळावर लँडिंग केले. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के.राममोहन नायडू, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार अमोल मिटकरी, माजी खासदार नवनीत राणा, अधिकारी निधी पांडे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हेही वाचा : Video : ‘राज’ भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘घरी बसून निवडणुका जिंकता येत नाही”