जळगाव, 25 मे : आता खरीप हंगामासाठी काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे कोणते बियाणे घ्यावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा असून विविध कंपन्यांच्या प्रचार गाड्यादेखील गावोगावी फिरत आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभागाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षी अंकुर सिड्सच्या स्वदेशी 5 या प्रचलित वाणाच्या नावाखाली बोगस बियाण्याची विक्री होऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. गुजरात राज्यातील आनंद आणि वडोदरा याठिकाणी कापसाच्या वाणाचे बिजोत्पादन घेतले जाते. मात्र, तेथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली आहे.
यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेली स्वदेशी 5 बियाणे मिळणार नाही. त्यामुळे स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन कृषी अधिकारी एस. पी. मोरे, मुक्ताईनगर यांनी केले आहे.