मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. या मालिकेतील हा आठवा लेख.
राज्याचे वैभव असलेले राजभवन ही संसदीय लोकशाहीतील प्रमुख संस्था आहे. राज्यपाल राज्याचे घटनाप्रमुख असतात. परंतु, राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता राज्यपाल हे कुटुंबप्रमुख देखील असतात. राजभवनात अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले जाते.

राज्यपालांच्या पत्नी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधतात, त्यांची विचारपूस करतात. यावेळी कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते मिठाई वाटप केले जाते.
यंदा महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत प्रवासात असल्यामुळे त्यांच्या वतीने राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना मिठाईवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता राज्यपाल आणि राजभवनातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यातील स्नेहबंधाचा सोहळा असतो.

राजभवनातील कर्मचाऱ्याला, कामगाराला, पोलीस जवानांना व अधिकाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे राज्यपालांना प्रत्यक्ष भेटण्याची व शुभेच्छा देण्याची एक संधी असते. त्यामुळे सर्व लोक या संधीची वाट पाहत असतात. अर्थात या कार्यक्रमासाठी पूर्वनियोजन केले जाते.
राजभवनातील सर्व विभागांमधील कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाचे कर्मचारी, माळी खाते, खानपान विभाग, पोलीस दलातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व श्रमिक – सेवक वर्ग या सर्वांना या कार्यक्रमाला आवर्जून बोलावले जाते. कार्यक्रमाच्या सकाळपासूनच कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. काही कर्मचारी पोशाखात तर काही सणावाराचे कपडे घालून कार्यक्रमाला उपस्थित राहतात.

पूर्वी मिठाई सोबत फटाके देण्याची देखील पद्धत होती. परंतु, पर्यावरण जागरुकता निर्माण झाल्यामुळे आता मात्र केवळ मिठाई वाटप केले जाते. कार्यक्रमाच्या दिवशी बरेचदा मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात व दिवे लावून परिसर सजवला जातो.

राज्यपाल शंकरनारायणन व त्यांच्या पत्नी राधा तसेच राज्यपाल विद्यासागर राव व त्यांच्या पत्नी विनोदा या कार्यक्रमाशिवाय कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलावून दिवाळी साजरी करीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका दिवाळीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

राजभवनातील प्रत्येक कर्मचारी, छोटा असो वा मोठा, या दिवशी आपण एकाच परिवाराचा भाग असल्याचा अनुभव घेतो. हा सोहळा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात आपुलकी व स्नेहाचा भाव जागवतो. या दिवशी घेतलेली छायाचित्रे कर्मचाऱ्यांच्या घरी अनेक वर्षानंतर देखील भिंतीवर विराजमान झालेली दिसतात. ती आठवण असते त्या राज्यपालांसोबत सोबत घालवलेल्या अनमोल क्षणांची!
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन, मुंबई)






