बारामती, 29 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर आज बारामतीमधील काटेवाडी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आज सकाळी साडेअकरा ते बारावाजेच्या सुमारास अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लाखोंचा जनसागर अजितदादांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार असून अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर –
दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.
या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.






