मुंबई, 30 जानेवारी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या वतीने कोण उपमुख्यमंत्री होणार याची चर्चा सुरू आहे. तसेच अर्थमंत्रीपद कुणाकडे जाणार, याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी केली आहे. तर याचसंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जी जनभावना आहे. तीच आमची भावना आहे आणि त्या जनभावनेचा आदर करुन त्याचप्रकारचा निर्णय घेतला जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक पार पडणार असून त्यामध्ये उद्या गटनेता निवडला जाणार आहे.
प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज तिसरा तिवस आहे, जो विधी आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी वेळ देत आहोत. मात्र, राजकीय पक्ष म्हणून योग्य निर्णय घेऊन ती जागा भरायची आहे. याबाबत बोलायला मुख्यमंत्र्यांकडे आलो होतो. कुटुंबासोबत चर्चा करावी लागेल. आमदार, सर्व नेत्यांची भावना जाणून आहे. सर्वांना दुख झाले आहे. त्या अनुरुप सर्वांना हवा, तसा निर्णय घेऊ.
सुनेत्रा पवार यांच्या नावाला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र, याबाबत त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ. जनभावना आणि आमची भावना एकच आहे. लवकरात लवकर आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू. अधिकृत नेता निवडल्यावर सर्व चर्चा करू. आता पक्षाचा, पदाचा विषय येत नाही. तात्पुरते काम सुरू आहे. विधिमंडळाची जागा भरायची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू इच्छितो, हे सांगायला मुख्यमंत्र्यांकडे आलो. लोकांना दुख झाले. आम्हालाही प्रचंड दुख झाले आहे. किमान आजच्या दिवसाचे विधी पूर्ण करुन आज किंवा उद्या चर्चा करुन उद्या माध्यमांना माहिती दिली जाईल, असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.






