मुंबई, 31 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. दरम्यान, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु असताना राजकीय घडामोडींना वेग आला. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी पक्षाची आज दुपारी विधानभवनात गटनेते पदाची निवड करण्यासाठी बैठक पार पडणार आहे. तसेच अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी मंजूरी मिळाल्याचे सांगितले जात असून आज त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
सुनेत्रा पवार मुंबईत दाखल –
सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित केले जात असताना त्या काल रात्री उशिराने बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. दरम्यान, सुनेत्रा पवार तसेच जय पवार हे आज 31 जानेवारी रोजी पहाटेच देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री –
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळ बैठक होणार आहे. त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर, सुनेत्रा पवार यांचा संध्याकाळी शपथविधी पार पडेल. दरम्यान, सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया –
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे काही निर्णय घेतले जातील, त्यांना आमचे पूर्ण समर्थन असेल. राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णयाला भाजपा आणि सरकारचा संपूर्ण पाठिंबा राहील.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दोन वेळा माझ्याशी चर्चा करून गेले असून, या चर्चेत त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीसह उपलब्ध पर्यायांबाबत माहिती दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय हा संबंधित पक्षाचाच असेल. त्या निर्णयाबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा : महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित






