मुंबई, 20 फेब्रुवारी : विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण (VB-G RAM G) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये 13 कोटी मनुष्यदिवसांवरून 16 कोटी मनुष्यदिवसांपर्यंत, म्हणजेच 3 कोटी मनुष्यदिवसांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत दिली असून या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान आभार मानले आहेत.
आर्थिक वर्ष 2025-26 साठी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल आणि विशेषतः अकुशल कामगारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नेमकी बातमी काय? –
केंद्र सरकारने ‘व्हीबी-जी रामजी’ (विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी–ग्रामीण) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1300 लाख मनुष्य-दिवसांवरून हे बजेट वाढवून 1600 लाख मनुष्य-दिवस करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
2025-26 या आर्थिक वर्षासाठी हा महत्त्वाचा निर्णय ग्रामीण विकास विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव शैलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत महाराष्ट्राच्या वाढत्या रोजगार गरजा लक्षात घेऊन श्रमिक बजेट वाढवण्यास मंजुरी देण्यात आली.
बातमीतील महत्वाचे मुद्दे –
- श्रमिक बजेटमध्ये 300 लाख मनुष्य-दिवसांची वाढ
- अधिक ग्रामीण कामगारांना रोजगार संधी
- अकुशल मजुरांना मोठा आर्थिक फायदा
- रस्ते आणि जलसंधारण कामांना गती
- पाणीपुरवठा व पायाभूत सुविधा मजबूत
- ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना
- स्थलांतरावर काही प्रमाणात बसणार आळा






