मुंबई, 17 मार्च: आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल आणि कोणताही लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी विधानसभेत दिली.
सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला त्यांनी उत्तर देताना त्यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले.
कातकरी आणि माडी या आदिवासी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात प्रा. वुईके म्हणाले की, पंतप्रधान जनमन योजनेसह विविध योजनांद्वारे आदिवासी भागातील विकासाला चालना दिली जात आहे. आदिवासी विकास विभाग आणि इतर विभागांच्या माध्यमातून एकूण १३ योजना राबविल्या जात असून त्या योजनांचा लाभ त्या भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची कामे करून घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रा. वुईके यांनी स्पष्ट केले.






