चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 23 मार्च: शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून ते व्यक्तीची आणि समाजाची परिस्थिती बदलविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करून उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
पाचोऱ्यात नर्मदा इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘ज्ञानोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षणाच्या व्यापक अर्थावर प्रकाश टाकताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळविणे हा नसून जीवन समृद्ध करणे हा आहे. निसर्ग, समाज आणि अर्थकारण यांची सखोल जाण निर्माण करून व्यक्तीला सक्षम बनविणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या संकल्पनेचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निश्चितच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘पोरांच्या मनात जगण्याची प्रेरणा निर्माण करा’ –
उपस्थित पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करताना गणेश शिंदे म्हणाले की, प्रशासन, कला, साहित्य, राजकारण, क्रीडा तसेच शेतीसारखी अनेक क्षेत्रे विद्यार्थ्यांसाठी खुली आहेत. या क्षेत्रांत मुलांनी आपले वेगळेपण सिद्ध करावे, यासाठी त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची ओळख करून त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे.
केवळ गुणांच्या मागे न लागता मुलांमध्ये चांगले संस्कार, सकारात्मक विचार आणि जगण्याची प्रेरणा निर्माण करणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी आहे. अशा सर्वांगीण दृष्टिकोनातून शिक्षण दिल्यासच विद्यार्थ्यांचा खरा विकास साध्य होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी –
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उभारलेली ही शैक्षणिक संस्था गोरगरिबांच्या मुलांसाठी आशेचा किरण ठरणार असून, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा ठसा अधिक उजळत राहावा, अशा शुभेच्छाही शिंदे यांनी व्यक्त केल्या. पाचोरा-भडगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काळानुसार बदल आवश्यक –
विद्यार्थ्यांनी सक्षम शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा ध्यास घ्यावा, असा सल्ला देताना शिंदे म्हणाले की, उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांनी नोकरीपुरते मर्यादित न राहता व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. यासाठी दहावी-बारावीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. दरम्यान, शिक्षणाच्या बळावरच गोरगरिबांच्या मुलांनी प्रशासनासह विविध क्षेत्रांत मोठी प्रगती साधली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार स्वतःत बदल घडवून आणणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक संदेश –
आपल्या भाषणात गणेश शिंदे यांनी महानायक अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या घडणीत पालक व शिक्षकांची भूमिका अधोरेखित केली.
“माणूस त्याच्या गुणांमुळे आणि कर्तृत्वामुळे ओळखला जातो. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये गुण, संस्कार आणि कर्तृत्व यांची जोपासना करण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत,” असे ते म्हणाले. तसेच आजच्या ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही संस्कारांचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी संत परंपरेतील ज्ञानोबा आणि तुकोबाराय यांचे विचार मुलांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
‘आपल्या मातीतले संस्कार विसरता कामा नयेत’ –
महाराष्ट्र शासन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्माच्या 750 व्या वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवत असताना प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांची गाथा असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर संवाद साधण्यासाठी जगाची भाषा आत्मसात केली पाहिजे, मात्र त्याचवेळी आपल्या मातीतले संस्कार विसरता कामा नयेत, यासाठी पालक आणि शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या घडणीत पालक व शिक्षकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात साधनांची प्रगती झाली असली तरी माणसामधील संवाद कुठेतरी हरवत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे’ –
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवणे आवश्यक असले तरी केवळ गुणपत्रिकेतील आकडे हीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरू शकत नाही, असे स्पष्ट मत गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी शाळेसोबतच पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनी आपल्या मुलांना मोठी स्वप्ने दाखवून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. गुणांसोबतच विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये यांची जडणघडण झाली तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनीच निर्मित केलेल्या ‘काय सांगू राणी गाव सुटना’ या काव्याचे ओळी गुणगुणल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी, प्रास्तविक शाळेच्या प्राचार्या राधिका प्रभू तर आभार पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक सुमित पाटील यांनी मानले. पाचोऱ्यात आयोजित ज्ञानोत्सवाला आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्षा सुनिताताई पाटील, भडगावच्या नगराध्यक्षा रेखाताई मालचे, संजय पाटील, पोलीस उपधीक्षक बापूसाहेब रोहम, तहसिलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेच्या अस्मिता पाटील, प्रियंकाताई पाटील, नर्मदा इंटरनॅशनल स्कूलचे संतोष पाटील, समाधान पवार यांच्यासह शिक्षक-शिक्षिका यांच्यासह पाचोरा-भडगावमधील पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






