चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 23 मार्च: पाचोरा शहरात नर्मदा इंटरनॅशनल स्कूलची सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात काल 22 मार्च रोजी सायंकाळी ज्ञानोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या राजकीय आणि व्यावसायिक प्रवासाचा उल्लेख करताना जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात येण्यापूर्वी तसेच राजकारणात आल्यानंतरही विविध व्यवसाय केले असून, त्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, व्यवसाय सांभाळत राजकारणातही यश मिळविणे शक्य झाले, हे जनतेच्या पाठबळामुळेच असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मागील २५ वर्षांच्या राजकीय प्रवासात पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे कधीही अपयशाचा सामना करावा लागला नाही. जनतेचे प्रेम आणि विश्वास हेच आपल्या आयुष्यातील खरे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील
मतदारसंघातील जनतेची साथ कायम आपल्या पाठीशी राहिल्यामुळेच आता शिक्षणाच्या क्षेत्रात ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’च्या माध्यमातून ज्ञानार्जनाचे कार्य हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात हे कार्य यशस्वी करण्यासाठी जनतेची साथ आणि पाठबळ असेच कायम राहील, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
राजकारणात येण्यापुर्वी तसेच आल्यानंतर अनेक प्रकारचे व्यवसाय केले. आणि त्या सर्व व्यवसायांमध्ये मी यशस्वी झालो. नुसताच यशस्वी झालो नाही तर ते व्यवसाय सांभाळून राजकारणातही यशस्वी झालो. मागील 25 वर्षांच्या माझ्या राजकीय प्रवासात पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात कधीही अपयशाचं सर्टिफिकेट घेण्याची वेळ आली नाही. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मी माझं हे भाग्य समजतो.
दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेची साथ ही माझ्यासोबत कायमस्वरूपी राहली आहे आणि त्या साथीच्या भरवश्यावरोवर आता ज्ञानार्जनाचं काम मी हाती घेतलंय. आगामी काळात ते काम यशस्वी करण्यासाठी आपली साथ माझ्या आणि नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या परिवाराच्या पाठीशी राहील, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
शिक्षण व्यवस्थेत वास्तववादी दृष्टिकोन ठेवण्याची गरज –
पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरील अपेक्षांबाबत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षक एखाद्या विषयात प्राविण्य मिळवून तो विषय अनेक वर्षे शिकवत असतात. मात्र, असे असूनही अनेक शिक्षकांना तो विषय पुस्तकांशिवाय शिकवणे अवघड जाते, असे त्यांनी नमूद केले.
एखादा शिक्षक आयुष्यभर एकाच विषयाचे अध्यापन करत असताना देखील तो विषय पुस्तकांशिवाय शिकवू शकत नाही, हे वास्तव चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. याउलट विद्यार्थ्यांकडून मात्र कमी कालावधीत अनेक विषय आत्मसात करण्याची अपेक्षा केली जाते.
विद्यार्थ्यांना सात ते आठ विषय केवळ सहा महिन्यांत शिकवले जातात आणि त्यांच्याकडून कोणतीही कॉपी न करता उच्च गुणांनी उत्तीर्ण होण्याची अपेक्षा ठेवली जाते. अशा परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरील अपेक्षांमध्ये असलेला तफावत योग्य आहे का, असा थेट सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान, शिक्षण व्यवस्थेत वास्तववादी दृष्टिकोन ठेवण्याची गरज असून, विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सूचित केले.
मुलं-मुली हीच पालकांची खरी संपत्ती –
मोलमजुरी करणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनातील भावना व्यक्त करताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, “अनेक पालकांकडे भौतिक संपत्ती नसली, तरी त्यांची मुलं हीच त्यांची खरी संपत्ती असते.” आपल्या मुला-मुलींना शिकवून त्यांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न प्रत्येक कष्टकरी पालक पाहत असतो. त्यासाठी ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून, पोटाला चिमटा देत शिक्षणासाठी झटत असतात.
“ज्या दिवशी आपला मुलगा किंवा मुलगी अधिकारी होईल, त्या दिवशीच माझ्या संपत्तीत खरी वाढ झाल्याचं समाधान मिळेल. हीच संपत्ती आयुष्यभर जपण्याचं स्वप्न प्रत्येक मोलमजुरी करणारा पालक पाहत असतो,” असेही त्यांनी नमूद केले.
पहिला प्रवेश सफाई कामगाराच्या मुलीची –
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिला प्रवेश पाचोरा नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या एका सफाई कामगाराच्या मुलीचा झाल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, संबंधित पालकाने तब्बल ४० हजार रुपये रोख जमा करून आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित केला.
एखादा सफाई कर्मचारी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इतका मोठा त्याग करत आहे, ही बाब अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. “पालक आपल्या मुलांना हीच खरी प्रॉपर्टी मानून शिक्षणासाठी ज्या संस्थेवर विश्वास ठेवतो, त्या संस्थेनेही त्या विश्वासाला पात्र ठरणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलबाबाबत काय म्हणाले? –
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्या पालकांसाठी दर रविवारी मोफत इंग्लिश स्पीकिंग क्लास उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, या इंग्लिश क्लासेसना स्वतःही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाचोरा तालुक्यात ‘डे-बोर्डिंग’ ही नवी संकल्पना राबविण्याचा माझा मानस असून, विद्यार्थी सकाळी ९ वाजता शाळेत आल्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळेच्या परिसरातच राहणार आहे. या कालावधीत नाश्ता, जेवण, अभ्यास, विविध क्लासेस तसेच खेळ यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत पालकांना नोकरीमुळे मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. तसेच, विद्यार्थी शाळेनंतर विविध क्लासेस आणि इतर गोष्टींमध्ये गुंतून जातात. या पार्श्वभूमीवर डे-बोर्डिंग संकल्पना राबवली जाणार असून, सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शाळा घेईल, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.
प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे –
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक विकास नव्हे, तर सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. “सर्वच विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ बनवण्याचा हेतू नसून, प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शारीरिक क्रियाकलापांद्वारे मानसिक आणि शारीरिक बळकटी देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, आधुनिक शिक्षणासोबतच संस्कार आणि संस्कृतीची जपणूकही केली जाणार आहे. “इंग्लिश माध्यमात शिक्षण घेत असतानाही, वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करण्याची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाईल,” असे त्यांनी नमूद केले. शाळेत सेमी-ऑलिम्पिक स्विमिंग टँक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विद्यार्थी हीच आपली खरी संपत्ती –
आतापर्यंत विविध क्षेत्रांत मिळवलेला विश्वास शिक्षण क्षेत्रातही कायम राखण्याचा आणि अधिक बळकट करण्याचा संकल्प असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले. “विद्यार्थी हीच आपली खरी संपत्ती असून, या संपत्तीचे मूल्य भविष्यात दुप्पट-तिप्पट वाढविण्याची जबाबदारी नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून माझी आहे,” असे ते म्हणाले. येत्या ११ जूनपासून शाळेची सुरुवात होणार असून, पुढील अडीच महिन्यांत शाळेच्या परिसरातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभारली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी, प्रास्तविक शाळेच्या प्राचार्या राधिका प्रभू तर आभार पाचोरा नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक सुमित पाटील यांनी मानले. पाचोऱ्यात आयोजित ज्ञानोत्सवाला प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, संजय पाटील, नगराध्यक्षा सुनिताताई पाटील, भडगावच्या नगराध्यक्षा रेखाताई मालचे, पोलीस उपधीक्षक बापूसाहेब रोहम, तहसिलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेच्या अस्मिता पाटील, प्रियंकाताई पाटील, नर्मदा इंटरनॅशनल स्कूलचे संतोष पाटील, समाधान पवार यांच्यासह शिक्षक-शिक्षिका यांच्यासह पाचोरा-भडगावमधील पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






