जळगाव, 27 मार्च: जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक तलाठी लाच प्रकरणाची बातमी समोर आली आहे. खरेदी केलेल्या शेतजमिनीवर शेती खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील करंज येथील तलाठ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. अजय बिडवे, असे गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय? –
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे संबंधित तलाठीच्या कार्यक्षेत्रात शेती खरेदी केली होती. या खरेदीची नोंद लावण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी ५,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव ACB कडे दिली होती.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, तलाठी बिडवे यांनी खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता संशय आल्याने बिडवे यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, लाच मागितल्याप्रकरणी जळगाव एसीबीच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या फिर्यादीवरून तलाठी अजय बिडवे यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील तसेच त्यांच्या पथकाने केली.






