मुंबई, 15 एप्रिल: राज्यातील तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 17 एप्रिल हा एप्रिल महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरू शकतो. अर्ध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद –
विदर्भात उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र झाला आहे. अकोला शहरात तब्बल 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. याशिवाय नागपूरमध्ये 42.2 अंश तापमान नोंदवले गेले, तर अमरावती (43.8), वर्धा (43.5), यवतमाळ व गडचिरोली (42.6) आणि वाशीम (42.4) येथेही तीव्र उष्णता जाणवत आहे. सलग काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे सकाळपासूनच उकाडा जाणवू लागला असून दुपारच्या सुमारास परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.
तापमान वाढण्याची शक्यता –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमान 43 ते 45 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने पुढील काही दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही तापमानात वाढ होणार असून पुढील दोन दिवसांत प्रत्येक शहरात 1 ते 2 अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये उकाडा वाढणार असला तरी 18 आणि 19 एप्रिलदरम्यान काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अतिउष्ण भागातून येणारे हे वारे मध्य भारत आणि विदर्भात उष्णतेची लाट निर्माण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घेऊन आरोग्य जपण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
उन्हापासून बचाव करत असताना नेमकी काय काळजी घ्याल? –
- भरपूर पाणी प्या; तहान लागली नसली तरी नियमित पाणी घेत राहा.
- घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.
- शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा.
- हलके, सैल आणि सूती कपडे परिधान करा.
- लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ आहारात समाविष्ट करा.
- उन्हात जास्त वेळ राहिल्यास मधूनमधून सावलीत विश्रांती घ्या.
- बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करा.
- लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
- बंद गाडीत (car) कोणालाही, विशेषतः मुलांना, एकटे सोडू नका.
- उष्माघाताची लक्षणे (डोके दुखणे, चक्कर, उलट्या, अशक्तपणा) दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा:






