चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
चेन्नई (तमिळनाडू), 10 मे: तमिळनाडूच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणाऱ्या आणि सिनेसृष्टीत ‘थलपती’ म्हणून लोकप्रिय असलेल्या विजय जोसेफ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी दमदार एन्ट्री केली. अभिनेता ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री असा हा त्यांचा प्रवास तमिळनाडूच्या बदलत्या राजकीय मानसिकतेचंही प्रतीक मानलं जात आहे.
विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ –
टीव्हीकेने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर राज्यपालांनी काल टीव्हीकेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्यानंतर आज विजय यांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चेन्नईतील नेहरू स्टेडियमवर जोसेफ विजय यांचा सकाळी 10 वाजता मोठ्या दिमाखात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपालांनी विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, विजय थलपती हे तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री झाले आहेत. याप्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विजय यांनी जुळवले सत्तेचे समीकरण –
तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर काल शनिवारी रात्री सत्तास्थापनेचा तिढा सुटला. तामिळनाडूत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तब्बल 107 जागा मिळाल्या. यानंतर मात्र, सत्तास्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले. निकालानंतरच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र, आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले.
विजय यांच्या सरकारला 121 आमदारांचे समर्थन –
- तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) – 108
- काँग्रेस – 5
- व्हीसीके – 2
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष – 2
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – 2
- आययूएमएल – 2
एकूण संख्या (बहुमत) – 121
विजय थलपती यांचा 1992 साली अभिनय क्षेत्रात प्रवेश –
जोसेफ विजय चंद्रशेखर अर्थात विजय थलपती यांनी 1992 सालापासून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरूवात करत अवघ्या कमी कालावधीतच तामिळ चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचे ते अभिनेते बनले. थलपती यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून ते तामिळ सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत.
विजय थलपती यांनी अनेक वर्षांच्या आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअर सोडत 2024 साली त्यांनी राजकारणात येत तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्ष स्थापन केला. तसेच यापुढे कुठल्याही सिनेमात काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विजय यांनी अचानक राजकारणात प्रवेश केला नाही. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ‘विजय मक्कल इयक्कम’ (Rasigar Mandrams) या आपल्या फॅन क्लबच्या माध्यमातून रक्तदानाचे कँप, मदतकार्य आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबवून एक मजबूत पायाभरणी केली होती.
पक्षाच्या स्थापनेनंतर अख्खा तामिळनाडू पिंजून काढला –
दक्षिणेतील सुपरस्टार म्हणून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विजय यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी त्याकडे केवळ स्टारडमच्या जोरावर उभा राहिलेला प्रयोग म्हणून पाहिलं होतं. मात्र, विजय यांनी हा समज फार कमी कालावधीत चुकीचा ठरवला. पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे करत थेट जनतेशी संवाद साधला. ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांना त्यांनी प्रचाराचा केंद्रबिंदू बनवलं.
टीव्हीके पक्षाला मिळाला अल्पवधीतच मोठा प्रतिसाद –
तामिळनाडूच्या राजकारणात अनेक दशकांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख पक्षांचं वर्चस्व राहिलं आहे. अशा परिस्थितीत नव्या पक्षासाठी राजकीय जागा निर्माण करणं हे मोठं आव्हान मानलं जात होतं. पण विजय यांनी पारंपरिक सभांपेक्षा जनसंपर्कावर अधिक भर देत ते थेट जनतेत उतरले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि भ्रष्टाचारविरोधी आक्रमक भूमिका यामुळे त्यांच्या पक्षाला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला.
विशेष म्हणजे, विजय यांच्या प्रचारसभांमध्ये केवळ सिनेस्टार पाहण्यासाठी गर्दी होत नसल्याचं चित्र यावेळी दिसलं. त्यांच्या भाषणांमध्ये राज्याच्या विकासाचा रोडमॅप, शिक्षण, रोजगार, उद्योग आणि प्रशासनातील पारदर्शकतेसारखे मुद्दे ठळकपणे मांडले गेले. त्यामुळे ‘स्टार’ ही प्रतिमा ओलांडत त्यांनी स्वतःला पर्याय म्हणून उभं करण्याचा प्रयत्न यशस्वी केला.
विजय यांच्या हाती तामिळनाडूची धुरा –
आजच्या शपथविधी सोहळ्याने त्या प्रवासाला अधिकृत शिक्कामोर्तब केलं. जनतेने प्रचंड अपेक्षांसह विजय यांच्या हाती राज्याची धुरा दिली असताना आत ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला ‘थलपती’ प्रशासन आणि राजकारणाच्या वास्तवात किती यशस्वी ठरतो, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विजय यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!






