जळगाव, 5 जून: विधानरपषिदेच्या निवडणुकासाठी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारी माघारीचा शेवटच्या दिवशी अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणुकासाठी अर्ज भरतानाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीत बंडखोरी केली. यामुळे जळगावातील बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गुवाहटी बंडाची आठवण करत सूचक वक्तव्य केलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
उमेदवारी माघारीचा शेवटच्या दिवशी पाळधी येथे पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जर आम्ही हा गुवाहटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असती? यामुळे मोठ्याने लहान भावाकडे लक्ष द्यावं, ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. केवळ चार जागा शिवसेनेला मिळत असतील आणि त्यातही त्याठिकाणी बंडखोरी होत असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे. यामुळे असा अन्याय होता कामा नये.
दरम्यान, शिवसेनेची पाच जागांवर मागणी असताना चार जागा आमच्या वाटेला आल्या तरी आम्ही त्याच्यावर समाधान मानले. मात्र, त्या चार जागांवरही बंडखोरी होत असेल तर आगामी काळासाठी महायुतीकरिता हे चुकीचे असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
‘….तर हा कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय!’ –
जळगावात आमचा बंडखोर उमेदवार उभा राहिलाय तर नाशिकमध्ये आमच्या उमेदवाराविरोधात बंडखोर उमेदवार उभा राहिला आहे. तर हा कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे. तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय असून सगळ्यांनी यावर आवर घालण्याची गरज असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
जळगावची चौरंगी लढत ठरणार लक्षवेधी –
अर्ज माघारीची मुदत संपताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. यामध्ये जळगावची लढत ही चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे या निवडणुकीत मतदार असल्याने, मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता गुप्त आणि उघड बैठकांचे सत्र सुरू होईल. दरम्यान, जळगावच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर कोण बाजी मारणार, याकडे जळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे –
- नंदकिशोर भागवत महाजन – भाजप
- तायडे शरद शामराव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
- चौधरी अनिल छबिलदास – अपक्ष
- रेश्मा कुंदन काळे – अपक्ष






