चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 25 जून: जळगाव जिल्ह्यातील धरणे, तलाव आणि सर्व जलाशयांचे खोलीकरण करून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविल्यास जळगाव जिल्हाच नव्हे तर खान्देश कायमस्वरूपी जलसमृद्ध होऊ शकतो, असा विश्वास शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील रंगराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी आज 25 जून रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देऊन विशेष योजना राबविण्याची मागणी केली आहे.
शेतकरी सेनेची अभिनव संकल्पना –
जळगाव जिल्हा कृषिप्रधान असून सुमारे ८.७७ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. तापी, गिरणा, वाघूर, पांझरा, हिवरा, बहुळा यांसारख्या नद्यांसह हातनूर, वाघूर, गिरणा, बोरी यांसारखे मोठे प्रकल्प तसेच अनेक मध्यम व लघु सिंचन प्रकल्प जिल्ह्याच्या जलव्यवस्थेला आधार देतात. मात्र, अनेक दशकांपासून जलाशयांमध्ये साचलेला गाळ आणि मुरूम यामुळे त्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जलाशयांचे गाळ काढून सुमारे २० ते २५ फूट खोलीकरण केल्यास मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जलसाठा निर्माण होऊ शकतो. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, विहिरी व बोअरवेल्सचे पुनर्भरण होईल तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाय मिळू शकतो, असेही सुनिल पाटील यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे या कामासाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहण किंवा नुकसानभरपाईची आवश्यकता भासणार नाही. शासन आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून हा प्रकल्प कमी खर्चात व अल्पावधीत राबविता येऊ शकतो. या उपक्रमातून केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जलव्यवस्थापनाचा आदर्श निर्माण होऊ शकतो, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे.
जलाशयांचे खोलीकरण हा सर्वांगीण विकासाचा प्रभावी उपाय –
केवळ गाळ न थांबता असलेल्या जलशयांचे खोलीकरण केल्यास पाणी साठवण क्षमतेत अनेक पटींनी वाढ होऊ शकते. यामुळे परिसरातील भूजल पुनर्भरणाला मोठी चालना मिळून नद्या, विहिरी आणि अन्य जलस्रोत वर्षभर पाण्याने समृद्ध राहू शकतात. परिणामी, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संवर्धन यांना बळ मिळण्याबरोबरच शेतीसाठी सिंचन आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. त्यामुळे जलाशयांचे खोलीकरण हा केवळ जलसाठा वाढविण्याचा नव्हे, तर सर्वांगीण विकासाचा प्रभावी उपाय ठरू शकतो, असा विश्वास सुनील पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जलाशय खोलीकरणाची व्यापक योजना तयार करण्याची मागणी –
जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेऊन जलाशय खोलीकरणाची व्यापक योजना तयार करावी, अशी मागणी शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, जलसंधारणाच्या माध्यमातून भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण मानला जात आहे.






