जळगाव, 29 जून: राज्यातील जनतेसाठी हवामान विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध भागात मान्सूनच्या पावसाचे दमदार आगमन झाले आहे. अशातच आजपासून राज्यात पावसाचा जोर कमालीचा वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता –
उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या जळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अशातच, मागील आठवड्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले असून विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आजपासून जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. जळगावसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचा तीन दिवसांचा हवामान अंदाज –
29 जून – दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
30 जून – दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
1 जुलै – अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून मेघगर्जनेसह पावसाच्या एक-दोन सरी कोसळण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना –
हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की, हतनूर धरणातून पुढील काही तासांत विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.






