चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 12 ऑगस्ट: पाचोरा तालुक्यातील लासगावातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेली लाखो रुपये किमतीची घंटागाडी गेल्या अनेक दिवसांपासून वापराविना धुळखात पडल्याचे ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे. एकीकडे गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत असताना, दुसरीकडे कचरा वाहतुकीसाठी असलेले वाहनच नियमित वापरात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरिष्ठ प्रशासनाच्या आदेशानंतरही घंटागाडी धुळखात? –
विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी मे महिन्यातच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.
असे स्पष्ट प्रशासकीय निर्देश असतानाही लासगावात कचरा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली घंटागाडी गेल्या अनेक दिवसांपासून वापराविना पडून असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे.
ग्रामस्थांमध्ये संताप –
घंटागाडी वापरात नसल्याने आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे पाहणीतून समोर आले. गावातील कचरा नियमितपणे उचलला जावा, परिसर स्वच्छ ठेवला जावा आणि उपलब्ध घंटागाडीचा प्रभावीपणे वापर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“कचरा संकलनासाठी उपलब्ध असलेली घंटागाडी ग्रामपंचायतीच्या मागे अनेक दिवसांपासून उभी आहे. घंटागाडी गावात फिरत नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावर, शाळेच्या परिसरात तसेच नदीत टाकत आहेत. याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित करत मागील आठवड्यात व्हिडिओही तयार केला होता; मात्र, त्याची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नाही.”
- संग्रामसिंह पाटील (ग्रामस्थ, लासगाव)
“ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली होती. सुरुवातीला सुमारे तीन महिने ती नियमित गावात फिरली; मात्र त्यानंतर ती बंद अवस्थेत पडून आहे. नागरिक कचरा देण्यासाठी घंटागाडीची प्रतीक्षा करत आहेत, मात्र घंटागाडी गावात फिरत नसल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी.”
- आनंदा पैठणकर (ग्रामपंचायत सदस्य, लासगाव)
“घंटागाडी गावात फिरत नसल्याने गावातील तरुणांनी याबाबत आवाज उठवला होता. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायतीकडून कचरा संकलनासाठी घंटागाडी नियमित सुरू करण्यात आलेली नाही. तसेच ग्रामपंचायतीने उभारलेले कचरा शेडही वापराविना आहे. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात असेल, तर त्याचा योग्य वापर करून गावात घंटागाडी नियमित फिरवली पाहिजे.”
– विशाल पाटील, (ग्रामस्थ, लासगाव)
“गावात मोठ्या प्रमाणात कचरा व्यवस्थापनाची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेले कचरा शेड सुरू नसल्याने नागरिक कचरा रस्त्यावर फेकत आहेत. यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. घंटागाडी बंद असण्याचे कारण ग्रामपंचायतीने स्पष्ट करणे गरजेचे आहे; मात्र, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.”
– सुनिल न्ह्यायदे (ग्रामस्थ, लासगाव)
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांचे आश्वासन –
दरम्यान, या प्रकाराबाबत ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या प्रतिनिधींनी पाठपुरावा केला असता, गावातील घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे आश्वासन ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले.
गेल्या काही दिवसांपासून वापराविना पडून असलेली घंटागाडी लवकरच नियमितपणे कचरा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गावातील कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
“गावातील घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्येची आम्ही दखल घेतली असून, त्याबाबत तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वापराविना असलेली घंटागाडी नादुरुस्त झाली होती. तिची दुरुस्ती करून बॅटरी चार्जिंग करण्यात येणार असून, लवकरच ही घंटागाडी नियमितपणे कचरा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल. तसेच गावातील कचरा व्यवस्थापन सुरळीत करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल.”
- प्रशांत पाटील (ग्रामपंचायत अधिकारी, लासगाव)
हेही वाचा: घाटकोपरमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा सहावर, बचावकार्य सुरू






