मुंबई, 12 ऑगस्ट: घाटकोपरमधील अशोक नगर परिसरातील गौसिया चाळ येथे आज बुधवारी (12 ऑगस्ट) पहाटे डोंगराचा मोठा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती असून, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गेल्या सहा ते सात तासांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी अल्ट्रा सेन्सर मशीन तसेच ड्रोनची मदत घेतली जात आहे. अद्याप काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरूच आहे.
धोकादायक घरांना यापूर्वी नोटिसा –
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त परिसर धोकादायक असल्याने तेथील रहिवाशांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या नोटिसांचे पालन करण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाखांची मदत –
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. घटनास्थळी अरुंद गल्ल्या असल्याने मोठी यंत्रसामग्री पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचाव पथकांकडून अत्यंत काळजीपूर्वक शोधमोहीम राबवली जात आहे. दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर






