पुणे, 29 जून: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी यापूर्वी २५ जून रोजी आरोपीला दोषी ठरविले होते. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत निकाल लागल्याने हा राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक ठरला आहे.
पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल –
शिक्षा सुनावताना न्यायालयाने हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले. पीडित मुलगी अवघी साडेतीन वर्षांची असून तिच्यावर अमानुष अत्याचार करून शांत डोक्याने हत्या करण्यात आली. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि इतर साक्षी यांमुळे गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
नराधमाला फाशीची शिक्षा –
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सर्वोच्च न्यायालयातील अनेक महत्त्वपूर्ण निकालांचा आधार घेतला. गुन्ह्यातील क्रूरता, पीडितेचे असहाय्य वय, समाजावर झालेला गंभीर परिणाम आणि आरोपीचा पूर्व इतिहास या बाबींचा विचार करून फाशीची शिक्षा देणेच योग्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक –
निकाल देताना न्यायालयाने आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही नोंदविला. यापूर्वीही त्याच्यावर अल्पवयीन मुलगी व महिलांवरील अत्याचाराचे आरोप असल्याचे निरीक्षण नोंदवत, त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
गुन्ह्यानंतर केवळ १६ दिवसांत आरोपपत्र दाखल –
नसरापूरच्या या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेचेही न्यायालयाने कौतुक केले. गुन्ह्यानंतर केवळ १६ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर खटल्याच्या सुनावणीत ५५ साक्षीदार तपासण्यात आले. पोलिस, फॉरेन्सिक तज्ज्ञ, सायबर तज्ज्ञ, डॉक्टर आणि विशेष सरकारी वकिलांनी समन्वयाने केलेल्या कामामुळे अल्पावधीत खटला निकाली निघाल्याचे न्यायालयाने म्हटले.
निर्भया प्रकरणानंतर बालकांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कठोर कायद्यांच्या पार्श्वभूमीवर अशा अमानुष गुन्ह्यांविरोधात न्यायव्यवस्था कठोर भूमिका घेत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. आरोपीचे कृत्य अत्यंत क्रूर, अमानवी आणि समाजमनाला हादरा देणारे असल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले.
हेही वाचा: टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – मंत्री दादाजी भूसे






