मुंबई, 29 जून: राज्यातील लाखो शेतकरी सध्या चिंतेत असून शेतकरी कर्जमाफीची प्रतिक्षा केली जात आहे. एकीकडे महायुती सरकारने 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलंय. मात्र, आता सरकारच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? –
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्य सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत विधानसभेत सकारात्मक चर्चा झाली असून, योजनेतील अटी व निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षानेही काही विधायक सूचना मांडल्या असून, त्या सरकार गांभीर्याने विचारात घेत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या विषयावर सकारात्मक आहेत.
View this post on Instagram
5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार –
सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असून, त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आवश्यक आर्थिक तरतुदीचाही समावेश आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर ती राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल आणि त्यानंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
View this post on Instagram
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शेतकऱ्यांच्या हिताची पूर्ण जाणीव असून, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे भरणे यांनी सांगितले. तसेच, अधिवेशनात आमदारांनी मांडलेल्या विधायक सूचनांची नोंद घेऊन त्यावर योग्य उत्तर देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






