मुंबई, 29 जून: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सभागृहात प्रभावीपणे वाचा फोडली. वारंवार येणाऱ्या वादळांमुळे होणारे शेतीचे नुकसान, पीक विमा कंपन्यांकडून मिळत नसलेली भरपाई तसेच हवामान बदलाच्या गंभीर परिणामांचा मुद्दा त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला.
आमदार अमोल जावळे काय म्हणाले? –
रावेर-यावल परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टी, वादळे आणि बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे. यंदाही एप्रिल, मे आणि जून महिन्यात आलेल्या वादळांमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच पीक विम्याअंतर्गत संरक्षित असलेल्या संपूर्ण क्षेत्राची भरपाई संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली.
View this post on Instagram
रावेर-यावल क्षेत्रासाठी विशेष मागणी –
याशिवाय रावेर-यावल परिसरात वारंवार होणारी वादळे आणि ढगफुटीसारख्या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी भारत सरकारचा हवामान विभाग, राज्याचा कृषी विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष तज्ज्ञ गट स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली.
दरम्यान, सातपुडा पर्वतरांगांतील जंगलतोड, तापी नदी परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानातील बदल यांचा सर्वांगीण अभ्यास करून रावेर-यावल क्षेत्राला ‘क्लायमेट सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित करावे. त्यामुळे विशेष निधी उपलब्ध होऊन भविष्यातील नैसर्गिक आपत्तींचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे सामना करता येईल, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
हेही वाचा: राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?






