ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 जुले: पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. याच अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील शेतकरी वासुदेव सुभाष आहेर यांच्या शेतातील पक्की विहीर पूर्णपणे धसल्याची घटना घडली. या प्रकरणी महसूल प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीची नोंद केली आहे. दरम्यान, शेतकऱ्याने शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी केली आहे.
तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडून तात्काळ कार्यवाही –
शेतकरी वासुदेव आहेर यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांची भेट घेऊन विहीर धसल्यामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली. याची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार बनसोडे यांनी शेतकऱ्याच्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच शासनाच्या नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना संबंधित महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.
View this post on Instagram
अतिवृष्टीत विहीर धसली –
शेतकरी वासुदेव आहेर यांनी सांगितले की, ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३२५/१ मधील पक्की विहीर पूर्णपणे धसली. सिमेंट व इतर बांधकाम साहित्याचा वापर करून बांधण्यात आलेल्या या विहिरीच्या सर्व १८ कंगण्या कोसळल्या असून विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार, विद्युत वायर आणि पाईपलाइनही पाण्यात गाडली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी दीपक शिवाजी दवंगे यांनी पंचनामा केला. पंचनाम्यात सुमारे ₹३ लाख ८० हजार १०० इतक्या नुकसानीची नोंद करण्यात आली असून विहीर पूर्णपणे नुकसानग्रस्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.






