गडचिरोली, 11 ऑगस्ट: धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना एकाचवेळी सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, तीन विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तसेच राज्यभरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आणून देत आदिवासी विकास मंत्र्यांनी संबंधित संस्थेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमशाळेची तपासणी करून अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश दिले. संबंधित आश्रमशाळेत शिक्षक आणि वॉर्डनची पुरेशी व्यवस्था नसतानाही शासकीय अनुदान घेतले जात असल्याची बाब बैठकीत समोर आली. त्यामुळे संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले.
राज्यातील केवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या आश्रमशाळांचीच पाहणी न करता दुर्गम आणि अंतर्गत भागातील आश्रमशाळांचीही नियमित तपासणी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच, आदिवासी आश्रमशाळांचे विशेष ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासणीत अनियमितता किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश देण्यात आले.
सर्व आश्रमशाळांची व्यापक तपासणी –
राज्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळत आहेत की नाही, यासाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत संबंधित सर्व विभागांचा समावेश करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
आश्रमशाळेचे संचालक किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येऊ नयेत, यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? –
धानोरा तालुक्यातील निवासी आश्रमशाळेत जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनी झोपल्या होत्या. रात्री सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर सर्व विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, धानोरा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. त्यानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला.
दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मडावी, इयत्ता सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैताम हिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, राज्यातील सर्व आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था आणि उपलब्ध सुविधांची व्यापक तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा: फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन






